मुंबई : राज्यात दडी मारलेल्या पावसाने पुनरागम केलं असून आजपासून पुढील चार दिवस राज्यात विविध ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाच्या सरी कोसळणार आहेत.
मागील तीन चार दिवसांपासून राज्यात तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्या आहेत. आजही कोकणासह मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. पुढील दोन-तीन दिवसात राज्यात मान्सून सुरळीत होण्याची शक्यता आहे. 19 ऑगस्ट रोजी राज्यात हवामान खात्याकडून कोणताही इशारा देण्यात आला नाही.
आज महाराष्ट्रात मुंबईसह, पुणे, ठाणे, पालघर, नाशिक, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर आणि सातारा या नऊ जिल्ह्यांना हवामान खात्याकडून येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. संबंधित जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. दरम्यान, याठिकाणी 30-40 किमी प्रतितास वेगानं वारे वाहणार असल्याचंही हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे. पुढील चार दिवस राज्यात कमी जास्त प्रमाणात हीच स्थिती राहणार आहे.
उद्या दक्षिण महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सांगली, सोलापूर, लातूर, उस्मानाबाद, बीड, नांदेड, हिंगोली आणि परभणी या आठ जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. दरम्यान आकाशात विजांचा गडगडाट अधिक असणार आहे. परिणामी विजा कोसळण्याचा धोका आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा हवामान तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे.
मागील सहा तासांपासून मुंबईसह, नवी मुंबई आणि ठाण्यात मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. सायंकाळनंतरही या भागात अनेक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळणार आहेत. मुंबई आणि ठाणे परिसराला हवामान खात्यानं येलो अलर्ट जारी केला आहे.