मुंबई : १६ ऑगस्टपासून राज्यातील काही बंधनं शिथिल करतो आहोत. पण करोनाचं संकट अजूनही टळलेलं नाही. त्यामुळं काळजी घेणं आवश्यक आहे. शिथीलता देत असताना ऑक्सिजनचे प्रमाण लक्षात घेऊन आपण निर्बंधात शिथिलता आणत आहोत. ज्यावेळी असं लक्षात येईल, की ऑक्सिजनचा पुरवठा कमी होतोय, त्यावेळी आपल्याला नाईलाजाने लॉकडाऊन लावावं लागेल,’ असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. स्वातंत्र्यदिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मंत्रालयात ध्वजारोहण झालं. त्यावेळी त्यांनी जनतेला संबोधन केलं. त्यावेळी ते बोलत होते.
‘गेल्यावर्षी आणि या वर्षीही दुसऱ्या लाटेत आपण कोरोनाचा कहर अनुभवला, आता काही प्रमाणात औषधं उपलब्ध झाली असली तरी पण ऑक्सिजन क्षमता अजूनही कमी आहे. ऑक्सिजनचे प्रमाण लक्षात घेऊन आपण निर्बंधात शिथिलता आणत आहोत. करोनाचे संकट अजूनही टळलेलं नाही. परदेशात काही ठिकाणी ते नव्याने उसळलेले आहे. आपल्याकडे हे संकट नव्याने उसळू नये म्हणून काळजी आपल्या सर्वांना घ्यायची आहे, असं आवाहन करतानाच ऑक्सिजनचा पुरवठा त्या मर्यादेच्या पुढे गेला, तर कदाचित आपल्याला लॉकडाऊन पुन्हा लावावा लागू शकतो,’ असा इशाराही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.
‘करोनाशी लढताना एका गोष्टीचं समाधान आहे की लसीकरणानं वेग घेतला आहे. कालच राज्यानं साडेनऊ लाख लोकांना लसीकरण करून एक वेगळा उच्चांक प्रस्थापित केला आहे. आज अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण करतो आहोत. आज सगळ्यांनी निश्चय केला पाहिजे, की मी माझा देश करोनामुक्त करणारच आणि पुढचा स्वातंत्र्यदिन मुक्त वातावरणात उत्साहात साजरा करणारच ही प्रतिज्ञा आपण करुयात,’ असं आवाहन यावेळी मुख्यमंत्र्यांनी केलं आहे.