मुंबई | गेल्या सात महिन्यांपासून स्थिर असणाऱ्या साखरेचे भाव सणासुदीच्या तोंडावर वाढू लागले आहे. ठोक बाजारात क्विंटल मागे दीडशे ते दोनशे रुपयांनी भाव वाढले आहेत परिणामी किरकोळ बाजारातही साखरेचे भाव वाढले आहेत.
गेल्या चौदा महिन्यांपासून सर्वांना कोरोना संकटाचा सामना करावा लागत आहे. कोरोनामुळे सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. आर्थिक परिस्थिती बिकट झाल्यामुळे या महागाईच्या काळात लोकांना झळ सोसावी लागत आहे.
दरम्यान, श्रावण लागला की सणांना सुरुवात होते. सणासुदीच्या काळात गोड-धोड बनवण्यासाठी साखरेची मागणी वाढते जाते. गेल्या सात महिन्यांपासून साखरेचा भाव स्थिरच होता. मात्र या आठवड्यात साखरेचा भाव वाढल्याने नागरिकांना झळ सोसावी लागणार आहे. किरकोळ बाजारात सध्या 37 ते 38 रुपये प्रतिकिलो साखरेचा भाव झाला आहे.