जळगाव – व्यापार, उद्योगांसह लहान-मोठे व्यवसाय येण्यासाठी उद्योगांना कच्चा माल वेळेत पोहोचून तयार झालेला पक्का माल आवश्यक बाजारपेठेत किंवा थेट ग्राहकांपर्यंत वेळेत पोहोचण्यासाठी दळणवळण हे प्रमुख साधन असते. रस्ते वाहतुकीतून किंवा रेल्वेने प्रवास किंवा मालाची ने-आण करावयाची झाल्यास व्यापार वृद्धींगत होत नाही. या पार्श्वभूमीवर आज जळगाव-मुंबई या विमान सेवेचा शुभारंभ झाल्याने भविष्यात बाहेरील तसेच स्थानिक उद्योजक अधिक जोमाने आपल्या उद्योगाला चालना देवू शकतील. असे प्रतिपादन जळगावचे खासदार उन्मेश पाटील यांनी जळगाव-मुंबई विमान सेवेच्या शुभारंभप्रसंगी विमान उड्डाणाला हिरवी झेंडी दाखविताना केले.
याप्रसंगी आमदार चंदूभाई पटेल, जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे, पोलिस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले, विमान प्राधिकरणाचे संचालक सुधीर मगीरवार, दाल मिल असोशिएशनचे अध्यक्ष प्रेम कोगटा, भरत अमळकर, प्राधिकरणाचे अधिकारी, कर्मचारी, पदाधिकारी यांचेसह प्रवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
खासदार श्री. पाटील म्हणाले की, प्रधानमंत्री उड्डाण योजनेच्या दुसर्या आणि तिसर्या टप्प्यानुसार शुभारंभ झालेल्या योजनेमुळे मोठमोठ्या व्यापारपेठा जळगावच्या जवळ येण्यास मदत होणार आहे. व्यापार उद्योगाला मदत होवून रोजगाराच्या संधी वाढतील, अहमदाबाद-जळगाव-मुंबई, पुणे, कोल्हापूर बरोबरच हैद्राबाद-पुणे या हवाई प्रवासास जळगावला थांबा मिळणार असल्याने या सर्व शहरांमध्ये जिल्ह्यातील शिक्षणासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांनाही या सेवेचा मोठा लाभ होणार असल्याचेही खासदार पाटील यांनी सांगितले.
या हवाई उड्डणांमध्ये येत्या 3 महिन्यात वाढ करून रात्री विमान उतरविण्यासाठी प्रयत्न असणार असल्याचे खासदार श्री. पाटील यांनी सांगितले. जळगाव-मुंबई पाठोपाठ आता जळगाव-पुणे अशी हवाई उड्डाणेही लवकरच सुरू करण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांनी यावेळी बोलताना म्हणाले की, जळगाव-मुंबई आणि अहमदाबाद-जळगाव अशा विमान प्रवासाच्या वेगवान दळणवळणाच्या साधनामुळे जिल्ह्याच्या विकासात भर पडेल. शिवाय जिल्ह्यातील रुग्णांना आता मुंबईला वैद्यकीय इलाजासाठी वेळेत जाता येईल. विमान प्राधिकरणाच्या विस्तारीकरणास प्रशासनाकडून आवश्यक ती प्रशासकीय मदत करण्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.
प्रारंभी विमान प्राधिकरणाचे जळगाव विमानतळ व्यवस्थापक सुधीर मगीरवार यांनी विस्तृतपणे माहिती सांगून भविष्यात ही विमानसेवा अधिक वृध्दिंगत होण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेृ जळगाव-मुंबई विमान प्रवासाला हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ झाल्यानंतर खासदार श्री. पाटील व उपस्थित मान्यवरांनी या विमानाच्या प्रवाश्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. या विमान प्रवासात पहिल्या दिवशी 58 प्रवाश्यांनी प्रवास केला. यानंतर खासदार श्री. पाटील यांनी या उपक्रमांची सविस्तर माहिती विमानतळावर आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यावेळी विविध वृत्तपत्रांचे प्रतिनिधी तसेच वृत्तवाहिन्यांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.