नांदेड: ‘वंचित बहुजन आघाडीला भाजपची ‘ टीम म्हणणाऱ्यांची अवस्था आता ‘बी’ टीमसारखी झाली असून वंचित आघाडी ‘ए’ टीम झाली आहे तर आगामी महाराष्ट्राच्या विधानसभेत विरोधी पक्षनेता काँग्रेस-राष्ट्रवादीचा नसेल तर वंचित बहुजन आघाडीचा असेल,’ असा टोला राष्ट्रवादी -काँग्रेसला लगावत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सूचक वक्तव्य केले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने नांदेड इथे झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्यावेळी त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आरोपांचा समाचार घेतला. वंचित बहुजन आघाडीच्या राजकारणावरून भाजपवर होणारे आरोप मुख्यमंत्र्यांनी फेटाळून लावले. नातेवाईकही पक्ष सोडून जात असल्याच्या पत्रकारांच्या प्रश्नावर काल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार भडकले होते. याबाबत मुख्यमंत्र्यांना विचारलं असता त्यांनी वैयक्तिक टिप्पणी करणं टाळलं. मात्र, ‘शरद पवारांनी काळाची पावलं ओळखायला हवीत. लोकांना सध्या नरेंद्र मोदी यांचं नेतृत्व आश्वासक वाटत आहे. राष्ट्रवादी हा पक्ष पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांपुरता मर्यादित राहिला आहे. तिथं लोकांना भविष्य नाही. त्यामुळं ते भाजपमध्ये येत आहेत. त्यावर पवारांनी काय प्रतिक्रिया द्यायची हा त्यांचा प्रश्न आहे,’ असं मुख्यमंत्री म्हणाले असून मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यामुळे विरोधकांच्या गोटात राजकीय भूकंप झाला आहे.