नाशिक- यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस प्रत्येकी 106 जागांवर लढणार आहे. या दोन्ही पक्षांनी उरलेल्या 40 जागा मित्र पक्षांना सोडण्याचा निर्णय घेतला आहे. गुरुवारी काँग्रेसची छाननी समितीची बैठक पार पडली. या बैठकीनंतर या दोन्ही पक्षात जागावाटप निश्चित झाले. जागांची अदलाबदल करायची असल्यास किंवा ज्या जागांबाबत वाद आहे .त्या जागांबाबतचा निर्णय काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार घेणार आहेत.
एका बातमीत म्हटलं आहे की, काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी जागा वाटपाचे सूत्र निश्चित झाले असल्याचे सांगितले आहे. 6 सप्टेंबरला काँग्रेस पहिली यादी जाहीर करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. 252 जागांच्या वाटपा बाबत दोन्ही काँग्रेसमध्ये एकमत झालं आहे. 36 जागांबाबत अजून निर्णय व्हायचा बाकी आहे.
या दोन्ही काँग्रेसने 40 जागा राजू शेट्टींची स्वाभिमानी शेतकरी संघटना, रिपाईं (कवाडे गट), बहुजन विकास आघाडी यासारख्या पक्षांना देण्याचं ठरवले आहे. असे असले तरी राज ठाकरेंच्या मनसेला जागा देण्याबाबत या बैठकीत काहीच चर्चा झाली नाही. मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जागांवरून दोन्ही काँग्रेसमध्ये वाद आहे. हा वाद दोन्ही काँग्रेसचे अध्यक्ष मिळून सोडवणार आहेत.