मुंबई: मागील अनेक महिन्यांपासून सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेलेल्या खाद्य तेलाच्या किमती कमी करण्यासाठी अखेर केंद्र सरकारने पावले उचलली आहेत. सरकारने पाम तेलासह विविध खाद्यतेलावरील आयात शुल्कात प्रती टन 8000 रुपयांची (112 डॉलर्स) कपात केली आहे.
त्याशिवाय क्रूड सोयाबीन तेलाच्या आयात शुल्कात देखील सरकारने प्रती टन ३७ डॉलरची कपात केली असून ते १४१५ डॉलर केले आहे. पाम तेलावरील आयात शुल्क ११२ डॉलरने कमी होऊन ११४८ डॉलर प्रती टन झाले आहे. आयात शुल्कात कपातीमुळे तेल आयातीचा खर्च कमी होणार आहे. यामुळे देशांतर्गत बाजारात पाम तेल आणि सोयाबीन तेलाच्या किमतीत घसरण होण्याची शक्यता आहे.
गेल्या काही दिवसांमध्ये खाद्यतेलाचे भाव प्रचंड वाढले होते. खाद्यतेलाच्या किमतीतील वाढीने सामान्यांच्या मासिक खर्चाचा ताळमेळ बिघडला होता. भारताकडून 70 टक्के खाद्यतेल आयात केले जाते. आंतरराष्ट्रीय स्तरावर खाद्यतेलाच्या वाढलेल्या किंमतीचा परिणाम भारतीय बाजारपेठेत पाहायला मिळत होता. मात्र, मोदी सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे लवकरच खाद्यतेलाचे भाव सामान्य पातळीवर येईल, असा अंदाज आहे.
मागील तीन महिन्यात खाद्यतेलांचे दर व उपलब्धता यांचा मेळ पूर्णपणे बिघडला आहे. भारतात दरवर्षी एकूण गरजेच्या ६० टक्के खाद्यतेल आयात होते. हे प्रमाण २५ ते ३० टक्क्यांनी कमी झाले आहे. यामुळे तीन महिने आधी सरासरी ११० ते १२५ रुपयांदरम्यान असलेले खाद्यतेल आता १८०-२०० रुपयांच्या घरांत गेले आहे. ‘खाद्यतेलाची आयात घटली आहे. खाद्य तेलावर पाच टक्के जीएसटीदेखील आकारला जात आहे. त्यामुळे खाद्य तेल विक्रमी पातळीवर गेले आहे. सध्या पाम तेलाचा भाव प्रती लीटर १२० ते १३० रुपये आहे. सोयाबीन तेलाचा भाव १४० ते १५० रुपये आहे. सनफ्लॉवर तेलाचा भाव १५० ते १७० रुपये आहे. तर शेंगदाणा तेलाने २०० रुपयांची पातळी केव्हाच ओलांडली आहे.