*पंचवीस कोटी रूपये खर्चून रुंदीकरण व इतर कामांना मंजुरी
*कार्यारंभ आदेशाने कामाला होणार सुरुवात
*नऊ किलोमीटर घाटासह एकुण पंधरा किलोमीटर रस्त्याची दुतर्फा दुरुस्ती
चाळीसगाव,(किशोर शेवरे)- जळगाव धुळे औरंगाबाद या जिल्ह्यांच्या दळणवळणात महत्त्वाची भूमिका बजावणारा औरंगाबाद धुळे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 211 या मार्गावर येणाऱ्या औट्रम घाटातील सुमारे नऊ किलोमीटरचा रस्ता मोठ-मोठे खड्डे पडल्याने नादुरुस्त झाला होता. या मुळे वाहतुकीची मोठी कोंडी होत असताना अपघाताचे प्रमाण देखील वाढले होते. या घाटासाठी जास्तीत जास्त निधी मिळावा. जेणेकरून येत्या पावसाळ्यात प्रवाश्यांचे हाल होऊ नयेत. यासाठी खासदार उन्मेश पाटील(unmesh patil) यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री ना.नितीनजी गडकरी(nitin gadkari) यांच्याकडे सातत्याने मोठा निधी मिळावा याकरिता प्रत्यक्ष भेट घेतली होती. आज कार्यारंभाचे पत्र प्राप्त झाले आहे. येत्या आठवड्यात प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार असल्याने कन्नड घाटाचा वनवास संपणार आहे.
चाळीसगाव(chalisgaon) परिसराचा दळणवळणाचा सेतू
खासदार उन्मेश दादा पाटील यांनी दिल्ली अधिवेशनानंतर औरंगाबाद येथे भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक यांच्यासोबत तातडीची बैठक घेतली होती. तेव्हा अधिकाऱ्यांनी आजच्या आज कन्नड घाटाची पाहणी करून तातडीने या घाटातील खड्डे बुजविण्यासाठी येत्या आठवड्यात मोहीम हाती घ्यावी. अशा सूचना केल्या होत्या त्या अनुषंगाने कन्नड घाटातील तत्कालीन दुरुस्तीचे कामे करण्यात आली होती. यामुळे काही प्रमाणात वाहतुक जाम होण्याची समस्या तेंव्हा पासुन सुटली होती.
पंचवीस कोटी रुपये खर्चून रुंदीकरण कामांचा कार्यारंभ आदेश
औट्रम घाटातील नऊ किलोमीटर रस्त्यासह घाटाच्या बाहेर दोन्हीं बाजूस सुमारे तिन तिन किलो मीटर असे सुमारे सहा किलोमीटर असा एकूण पंधरा किलोमीटर कामाच्या रुंदीकरण इतर दुरुस्तीसाठी 25 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून त्या कामाचे कार्यारंभ आदेश देण्यात आले आहेत. त्यामूळे कन्नड घाट दुरूस्ती कामाला लवकरच सुरुवात होणार आहे. गेल्या दोन-तीन वर्षांपासून घाटाची सर्वसमावेशक दुरुस्ती व्हावी यासाठी मोठा निधी मंजूर व्हावा यासाठी खासदार उन्मेश दादा पाटील प्रयत्नशील होते.अखेर २५ कोटी रुपयांच्या खर्चातून कन्नड घाटात अनेक ठिकाणी रुंदीकरण होऊन घाट रस्ता आकर्षक होणार आहे.
जनतेची वाहतूक कोंडीतून सुटका होणार
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 211 कायमचा दुरुस्त करण्यात येणार असून घाटात सुमारे नऊ किलोमीटरचा रस्तासह पंधरा किलोमीटर डांबरीकरण, घाटात नवीन बॅरिकेट्स , पाऊसाचे पाण्याचा निचरा होण्यासाठी चाऱ्याची दुरूस्ती. खचलेल्या रस्त्यांची दुरूस्ती, जागोजागी दिशादर्शक फलक लावण्यात येणार आहे.