दिल्ली – भारताचा स्वातंत्र्यदिन म्हणजे १५ ऑगस्ट. या दिवसाची सगळेच भारतीय आतुरतेने वाट पहात असतात. मात्र याच दिवसाबाबत पाकिस्तानचे नापाक मनसुबे समोर आले आहेत. १५ ऑगस्ट हा काळा दिवस म्हणून जाहीर करण्यात आला आहे. पाकिस्तान सरकारने या संदर्भातले एक पत्रकच जारी केले आहे.
सॅटेलाईट टीव्ही चॅनल्स, एफएम रेडिओ चॅनल्स या सगळ्यांना ही सूचना पत्रकाद्वारे देण्यात आली आहे. १५ ऑगस्टच्या दिवशी कोणताही विशेष कार्यक्रम करायचा नाही. काश्मीरसंदर्भात आत्मियता असलेल्या बातम्या आणि व्हिडिओच प्रसारित करावेत असंही या पत्रकात पाक सरकारने म्हटलं आहे.
१४ ऑगस्ट हा आपल्या देशाचा स्वातंत्र्यदिन आहे. हा दिवस आपल्या काश्मीरच्या एकतेचं प्रतीक म्हणून साजरा केला जावा असंही पाक सरकारने म्हटलं आहे. १५ ऑगस्ट हा काळा दिवस म्हणूनच दाखवला गेला पाहिजे. या दिवशी झेंडाही अर्ध्यावर आणावा. तसेच भारत आणि पाकिस्तान या दोन देशांच्या भूमिका काय आहेत हे दाखवणारे व्हिडिओज दाखवले जावेत. इतकंच नाही तर पाकव्याप्त काश्मीरबाबत पाकिस्तानची भूमिका काय तेही स्पष्ट करावे असेही निर्देश देण्यात आले आहे