मुंबई, (प्रतिनिधी)- राज्यात १५ एप्रिल पासून कडक निर्बंध लावण्यात आले आहे, यात अत्यावशक सेवा सुरु ठेवण्यात आल्या असून नागरिक विविध कारणं पुढे करून विनाकारण फिरतानाचे निदर्शनात आले असल्याने आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत राज्यातील लॉकडाऊन अधिक कडक करण्यावर चर्चा झाली असून किराणा दुकानं सकाळी ७ ते ११ यावेळत सुरु ठेवण्यावर विचार झाला आहे असं आरोग्य मंत्री डॉ. राजेश टोपे यांनी सांगितलं असल्यानं राज्यात लॉकडाऊन अधिक कडक होणार असल्याचे संकेत मिळाले आहे.
दरम्यान राज्यात आज 58924 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 52412 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत.एकूण 3159240 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत.राज्यात एकूण 676520 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 81.04% झाले असल्याची माहिती आरोग्य मंत्री डॉ. राजेश टोपे यांनी दिली आहे.
राज्यात कडक निर्बंध लावण्यात आले असून देखील कोरोना संसर्गाची वाढती संख्या आवाक्यात यायचं नाव घेत नसल्यानं चिंता व्यक्त होतं आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्ण संख्या वाढत असल्याने आरोग्य यंत्रनेवर प्रचंड ताण पडत आहे. गेल्या काही दिवसांपासून ऑक्सिजन, बेड, व्हॅन्टिलिटर, रेमडेसीवर चा तुटवडा जाणवत असल्यानं चांगलीच तारांबळ उडत आहे.
नागरिकांनी काळजी घेण्याची गरज…
राज्यातील वाढता कोरोना संसर्ग पाहता नागरिकांनी देखील स्वयंस्फूर्तीने काळजी घेण्याची वेळ आता आली आहे. सरकार तर त्यांच्या स्तरावर कोरोना परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करेलच परंतु नागरिकांनी देखील काळजी घेणं आता आवश्यक आहे.