- जिल्ह्यातील विविध प्रकल्पांमध्ये
आजपर्यंत 21.76 टीएमसी उपयुक्त साठा
मागील वर्षीच्या तुलनेत 9.27 टीएमसी अधिक साठा शिल्लक - जिल्ह्यातील हतनुर, गिरणा व वाघूर या मोठ्या प्रकल्पांत 17.71 टीएमसी उपयुक्त साठा
- मध्यम प्रकल्पांमध्ये 2.94 टीएमसी तर लघु प्रकल्पांमध्ये 1.11 टीएमसी उपयुक्त साठा
- मध्यम प्रकल्पांपैकी अभोरा, मंगरुळ, सुकी, तोंडापूर या चार प्रकल्पांमध्ये 100 टक्के उपयुक्त साठा
- अग्नावती, हिवरा, अंजनी, भोकरबारी, मन्याड या प्रकल्पांमध्ये अद्यापही फारसा उपयुक्त साठा नाही
- मंगरुळ, सुकी, मोर, तोंडापूर, गुळ या प्रकल्पांच्या सांडव्यातून पाण्याचा विसर्ग सुरु
जळगाव, दि. 11 – जिल्ह्यातील धरण परिसरात गेल्या काही दिवासांपासून सतत पडत असलेल्या पावसामुळे धरणांच्या पाणी पातळीत चांगली वाढ झाली असून जिल्ह्यातील हतनूर, गिरणा व वाघूर या तीन मोठ्या प्रकल्पांमध्ये 17.71 टीएमसी इतका उपयुक्त पाणीसाठा झाला असून मध्यम प्रकल्पांमध्ये 2.94 टीएमसी तर लघु प्रकल्पांमध्ये 1.11 टीएमसी असा एकूण 21.76 टीएमसी उपयुक्त साठा झाला आहे. मागील वर्षी आजच्या दिवशी जिल्ह्यातील विविध प्रकल्पांमध्ये फक्त 353.68 दलघफु म्हणजेच 12.49 टीएमसी इतकाच पाणीसाठा शिल्लक होता. त्यामाणाने यावर्षी जिल्ह्यात चांगला पाऊस पडल्याने जिल्ह्यातील प्रकल्पांचा पाणीसाठा वाढला असल्याने ही अतिशय समाधानाची बाब आहे. असे असले तरी नागरीकांनी व शेतकऱ्यांनी उपयुक्त पाण्याचा जपून वापर करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
जिल्ह्यात हतनूर, गिरणा, वाघूर हे तीन मोठे प्रकल्प आहे. अभोरा, मंगरुळ, सुकी, मोर, अग्नावती, हिवरा, बहुळा, तोंडापूर, अंजनी, गुळ, भोकरबारी, बोरी, मन्याड हे तेरा मध्यम प्रकल्प आहे. तर 96 लघु प्रकल्प आहे. या सर्व प्रकल्पांचा एकूण प्रकल्पीय उपयुक्त साठा 1427.51 दलघमी म्हणजेच 50.40 टीएमसी इतका आहे. त्यानुसार जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये आजपर्यंत 43.17 टक्के इतका उपयुक्त साठा शिल्लक आहे.हतनूर धरण परिसरात पडत असलेल्या पावसामुळे धरणाचे आज दुपारी बारा वाजेपर्यंत 24 गेट पूर्ण उघडले असून धरणातून 73 हजार 713 व्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरु आहे. अशी माहिती जळगाव पाटबंधारे विभागाचे उप कार्यकारी अभियंता यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहे. जिल्ह्यातील मोठ्या प्रकल्पांचा प्रकल्पीय उपयुक्त साठा 1027.10 दलघमी म्हणजेच 36.26 टीएमसी इतका असून आजअखेर या प्रकल्पांमध्ये 501.52 दलघमी म्हणजेच 17.71 टीएमसी उपयुक्त साठा आहे. यामध्ये हतनूर धरणात 1.41 टीएमसी, गिरणा 12.94 टीएमसी, तर वाघूर धरणात 3.35 टीएमसी इतका उपयुक्त साठा आहे. यावर्षी आजपर्यंत हतनूर धरण क्षेत्रात 543 मिमी, गिरणा धरण क्षेत्रात 316 मिमी तर वाघूर धरण क्षेत्रात 644 मिमी इतका पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. तसेच जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पांचा प्रकल्पीय उपयुक्त साठा 203.91 दलघमी म्हणजेच 7.20 टीएमसी इतका असून आजअखेर या प्रकल्पांमध्ये 83.22 दलघमी म्हणजेच 2.94 टीएमसी इतका उपयुक्त साठा आहे. तर जिल्ह्यातील लघु प्रकल्पांचा प्रकल्पीय उपयुक्त साठा 196.50 दलघमी म्हणजेच 6.93 टीएमसी इतका असून आजअखेर या प्रकल्पांमध्ये 31.56 दलघमी म्हणजेच 1.11 टीएमसी इतका उपयुक्त साठा आहे. जिल्ह्यातील तेरा मध्यम प्रकल्पांपैकी अभोरा,मंगरुळ, सुकी, तोंडापूर या चार प्रकल्पांमध्ये 100 टक्के उपयुक्त साठा झाला असून मोर प्रकल्पात 71.87 टक्के, बहुळा 14.26 टक्के, गुळ 64.32 टक्के, बोरी 14.37 टक्के उपयुक्त साठा आहे. अग्नावती, हिवरा, अंजनी, भोकरबारी, मन्याड या प्रकल्पांमध्ये अद्यापही फारसा उपयुक्त साठा नाही. मात्र मंगरुळ, सुकी, मोर, तोंडापूर, गुळ या प्रकल्पांच्या सांडव्यातून पाण्याचा विसर्ग सुरु आहे.