मुंबई, (प्रतिनिधी)- कोरोनाला रोखण्यासाठी काँग्रेसच्या नेतृत्वाने वेळोवेळी केंद्र सरकारला सूचना केल्या. मात्र ‘त्या’ सूचनांची टिंगल करण्याव्यतिरिक्त केंद्राने काही केलं नाही. जर वेळीच ‘त्या’ सूचना गांभीर्याने घेतल्या असत्या तर आज लोकांना हकनाक आपले जीव गमवावे लागले नसते असा घणाघाती आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ट्विट करून मोदी सरकारवर केला आहेत.
नाना पटोले यांनी पुढे म्हटलं आहे की,कोरोनाचा प्रार्दुभाव सुरु झाल्यापासून खा. राहुल गांधी सातत्याने केंद्र सरकारला आर्थिक पातळीवर होऊ शकणारे नुकसान तसेच वैद्यकीय क्षेत्रात करावयाच्या उपाययोजनांवर सूचना करत असताना देशाचे पंतप्रधान मात्र जनतेला टाळ्या, थाळ्या वाजवायला आणि दिवे लावायला सांगत होते.
दरम्यान १२ फेब्रुवारी २०२० रोजी राहुल गांधी यांनी सरकारला गंभीर परिणामाचा इशारा दिला. आज एक वर्षानंतरही तीच परिस्थिती कायम आहे. नोटाबंदी, चुकीच्या पद्धतीने केलेली जीएसटीची अंमलबजावणी, कोणतीही पूर्वसूचना न देता व नियोजन न करता लावलेल्या लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्था ऐतिहासिक रसातळाला गेली असल्याचं नाना पटोले यांनी नमूद केलं.
लॉकडाऊनमध्ये अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी गरिबांच्या बँक खात्यात रोख रक्कम जमा करण्याची सूचना राहुल गांधी यांनी मोदी सरकारला केली होती पण नेहमीच्या सवयीप्रमाणे त्याकडे दुर्लक्ष केले गेले त्याची फळं आज देशातील गरीब जनता भोगते आहे असा गंभीर आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ.नाना पटोले यांनी केला आहे.