पंढरपूर दिनांक १४ ( प्रतिनिधी )- कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा असे म्हणणे भाजपने सिध्द करून दाखवले आहे. मातोश्रीवर देवेंद्र फडणवीसांनी एक गुच्छ पाठविला असता तर युतीचे सरकार आले असते. मात्र अहंकार नडला आणि शरद पवार साहेबांनी अचूकपणे तिघांना एकत्र आणले. आता तुमचे १०५ असले तरी आमचे १७० आहेत….म्हैस तुमची असली तरी दांडा आमचा असल्याची जोरदार टोलेबाजी करत राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी पंढरपूर – मंगळवेढा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार भगिरथ भालके यांच्या प्रचार सभांमध्ये भाजपवर टीकास्त्र सोडले. खान्देशातील शिवसेनेची ही मुलूखमैदानी तोफ पंढरपुरात धडकल्याने एकच धमाल उडाली. तर दिवंगत आमदार भारत भालके यांचे स्वप्न असणार्या ३५ गावांच्या पाणी पुरवठा योजनेची पूर्तता करण्याची ग्वाही देखील त्यांनी दिली.
ना. गुलाबराव पाटील यांनी आज पंढरपूर मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार भगिरथ भालके यांच्या प्रचारासाठी दोन सभा घेतल्या. यातील पहिल्या सभेत बोलतांना राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून आपल्या भाषणाला प्रारंभ केला. आपण आयुष्यात पहिल्यांदा राष्ट्रवादीला मत मागण्यासाठी जाहीररित्या भाषण करत असल्याचे त्यांनी सांगितले. काँग्रेस राष्ट्रवादीला शिव्याशाप देण्यात आमचे आयुष्य गेले. मात्र कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा असे म्हणले जात असून ते भाजपने सिध्द केले असे म्हणत त्यांनी जोरदार टीकास्त्र सोडले. दिवंगत आमदार भारत भालके यांच्यासोबतच्या स्नेहाला आणि त्यांच्या आठवणींना ना. गुलाबराव पाटील यांनी उजाळा दिला. भालकेनाना हे राष्ट्रवादीतील शिवसैनिक असल्याची स्तुतीसुमने त्यांनी उधळली.
ना. पाटील पुढे म्हणाले की, आपण १९८२ साली पानटपरी चालवत होतो. यानंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी डोक्यावर हात ठेवल्यामुळे पाचदा आमदार तर दोनदा मंत्री झालो. यासाठी किती केसेस झाल्या ते सांगता येणार नाही. आपल्या डोक्यात मंत्रीपद गेलेले नसून आपण आजही टपरीवालाच असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले. आपण दाढी आणि केस काढल्यामुळे कोणी ओळखत नसल्याने काल रात्री येथे फिरलो. येथील वातावरणाचा अंदाज घेतला असता ही जागा आपण ३५ ते ४० हजारांनी जिंकणार असल्याचा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
याप्रसंगी ना. गुलाबराव पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. ते म्हणाले की, फडणविसांनी मातोश्रीवर एक गुच्छ पाठविला असता तर युतीचे सरकार बनले असते. मात्र ते अहंकारात राहिले आणि पवार साहेबांनी संधी साधून तिघांना एकत्र आणले. पंढरपूरच्या निवडणुकीत पैसा येणार असल्याची चर्चा असल्यावरही ना. पाटील यांनी खुमासदार भाष्य करत लोकांनी १६ तारखेला बाहेर खाटा टाकून दर्शनाची वाट पहावी असे म्हणताच एकच हशा पिकला. तर, अलीकडच्या निवडणुकीत माझ्या विरूध्दच्या उमेदवाराने प्रचंड पैसा खर्च करूनही आपण बहुमताने आलो असल्याचे सांगत पैशांच्या राजकारणाच्या मर्यादा स्पष्ट केल्या. या निवडणुकीत भगिरथ भालके यांना बिनविरोध निवडून देणे शक्य असतांनाही असे न झाल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. भारत भालके यांनी ३५ गावांची पाणी पुरवठा योजनेचे पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण कटीबध्द असल्याचेही त्यांनी आवर्जून नमूद केले.
दुपारी पंढरपुरात झालेल्या सभेत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यांची उपस्थिती होती. या सभेत देखील ना. गुलाबराव पाटील यांनी जोरदार टोलेबाजी करत उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. ते म्हणाले की, आम्हाला भाजप तीन तिघाडा म्हणून हिणवते. मात्र आमचे रिक्षाचे सरकार असून तीन चाकीमध्ये सर्वसामान्य माणूस बसतो. यामुळे आमचे सरकार हे सर्वसामान्यांचे सरकार आहे. शरद पवार साहेबांप्रमाणेच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी देखील सर्वसामान्य कार्यकर्त्यांना घडविले. मी देखील त्यातलाच एक आहे. सत्ता गेल्यामुळे देवेंद्र फडणवीस कासाविस झाले आहेत. ते नेहमी १०५ जणांचे उदाहरण देतात. मात्र आमच्याकडे १७० जण असल्याचे ते विसरतात. देवेंद्रजींकडे अगदी ग्रामपंचायतीत सुध्दा विरोधकांचे काम होत नाहीत. यामुळे आता सत्तेत असणार्या महाविकास आघाडीच्या उमेदवाराला विजयी करण्याचे आवाहन ना. गुलाबराव पाटील यांनी केले.