रावेर,(विनोद कोळी)- मौजे खिर्डी बु येथे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत कडून स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत आहे. विशेष करून वार्ड क्र. १ मध्ये मोठ्या प्रमाणात घाण साचलेली आहे. जागे-जागी कचऱ्याचे ढीग लागलेले आहे, कच-यांनी गटारी तुंबलेल्या आहेत. त्यामुळे मच्छरांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढलेले असून रोग-राई पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही.
एकीकडे कोरोना सारख्या महामारीने खिर्डी किंवा महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण देशच त्रासलेला असल्याने, अस्वच्छतेमुळे दुसरे संकट ओढवण्याची वेळ खिर्डी बु येथील नागरिकांवर येऊन ठेपलेली आहे. ग्रामपंचायत कडून स्वच्छतेकडे दुर्लक्ष मोठ्या प्रमाणावर होत आहे.
तसेच सरपंच व ग्रामसेवक यांना याबाबत तक्रार केली असता कुठल्याही प्रकारे नागरिकांच्या तक्रारीची दखल घेतली जात नाही. व समस्येवर ग्रामपंचायत कार्यालयाकडून कुठलीही कार्यवाही होत नसून त्यामुळे एक ते दीड महिना आधी गटविकास अधिकारी रावेर यांना तक्रार दाखल केली असता त्याच्याकडूनही तक्रारीची दखल घेतली गेली नाही, म्हणून त्यांना पुनश्च पत्राद्वारे स्मरण देऊन समस्या सोडवण्याची विनंती करण्यात आली.
याबाबत शे.असलम म्हणाले की, गेली १५-२० दिवस आधी भामलवाडी रोड वरील मोठी सांडपाण्याची गटार JCB च्या सहाय्याने काढण्यात आली व त्यातील घाण रस्त्याच्या कडेला टाकण्यात आली ती घाण सुकून पुन्हा त्याच गटार मध्ये जात असून गटार कचऱ्याने तुंबत आहे. ग्रामपंचायतीला ती घाण भरण्याला मुहर्त मिळत नसल्याने मोठ्या प्रमाणावर शासकीय पैशाचा अपव्यय ग्रामपंचायत कडून झालेला आहे.
स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत असल्याची तक्रार पुनश्च गटविकास अधिकारी रावेर यांच्याकडे नोंदवण्यात आल्यानंतर तक्रारदार शे.असलम शे.नजीर यांनी सदरील माहिती ‘नजरकैद’ प्रतिनिधी शी बोलतांना दिली.