पुणे – राज्यात पूरग्रस्त भागांमध्ये शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक भाग पाण्यात गेले आहेत. त्यामुळे शासनाने पूर ओसरल्यानंतर या भागातील नुकसानीचे तातडीने पंचनामे करून भरपाईचे मोजमाप करावे आणि शेती व दुग्धव्यवसायाचे झालेले नुकसान लक्षात घेता, या भागात शंभर टक्के कर्जमाफीचा निर्णय केंद्र क राज्य सरकारने घ्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत केली.
राज्यात पूर परिस्थितीमुळे अभूतपूर्व नुकसान झाले असून पूरग्रस्तांना मदत करण्यात शासकीय यंत्रणा कमी पडल्याची खंतही पवारांनी क्यक्त केली. कोल्हापूर, सांगली, साताऱ्यात फळं, शेती, पीकं, रस्ते, दुकानं, पायाभूत सुविधांचं मोठं नुकसान झालं आहे. शेत जमीनीची मातीही वाहून गेली आहे. शेतकऱ्यांनी पुरामुळे सोडून दिलेलं पशूधनही वाहून गेले आहे. या भागातून होणाऱ्या दूध पुरवठय़ाची 35 ते 40 टक्के आवक घटली असून पुराचा दुग्ध व्यवसायालाही मोठा फटका बसला आहे. चोहोबाजूने शेतकऱ्यांना नुकसानीचा सामना करावा लागत आहे. पूर ओसरल्यानंतर या नुकसानीचा खरा अंदाज येईल, असं त्यांनी सांगितले.
राष्ट्रवादी करणार मदत
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस कामाला लागली आहे. आमचे सर्व लोकप्रतिनिधी त्यांचा एक महिन्याचा पगार पूरग्रस्तांच्या मदतीसाठी देणार आहेत. 50 लाखांचा धनादेश आम्ही देणार आहोत, असं पवार म्हणाले.