जळगाव, (प्रतिनिधी)– जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या प्रकरणी निंभोरा पोलीस स्टेशन येथे अॅड. विजय भास्कर पाटील यांनी दाखल केलेला गुन्हा खोटा असुन आम्हाला अडकविण्यासाठी, बदनाम करण्यासाठीचा हा खटाटोप आहे.या पडद्यामागचा हिरो वेगळाच असून सुडाचं राजकारण होतांना दिसत असल्याचा आरोप माजी मंत्री आ. गिरीश महाजन यांनी आज दि.18 रोजी आयोजित पत्रकार परिषदेत केला.
यावेळी बोलतांना आ. महाजन म्हणाले की, ऐनकेन प्रकारे मला आणि माझ्या सहकार्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. हा गुन्हा दाखल करून घेण्यासाठी मुंबईतून गृहखात्याकडून दबाव असल्याची माहिती आमदार गिरीश महाजन यांनी दिली.
तीन वर्षानंतर तक्रार…
मविप्र संस्थेच्या वादावरून अॅड. विजय पाटील यांनी पुण्यात घडलेल्या घटनेची जळगाव जिल्ह्यातील निंभोरा येथे तीन वर्षानंतर तक्रार दिली हा प्रकार हास्यास्पद आहे. माझ्यासह २९ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. हा सगळा बनावट प्रकार असुन ही तक्रार रद्द (स्क्वॅश) करण्यासाठी मी मे.उच्च न्यायालयात अपील केले आहे. दि. ७ जानेवारीपर्यंत यात कुठलीही कारवाई करू नये असे न्यायालयाने आदेश दिले असून चौकशी करून न्यायालयात सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहे.
मविप्र संस्था ही मराठा समाजाची संस्था आहे. या संस्थेत मी सभासदही होऊ शकत नाही. माझा या संस्थेशी कुठलाही संबंध नाही. बनावट घटना तयार करून तीन वर्षानंतर तक्रार दाखल करणे म्हणजे गलिच्छ राजकारण आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी आम्ही मागणी केली आहे.
याउलट अॅड. विजय पाटील हे स्वत: मविप्र संस्थेच्या वादातून जेलमध्ये होते.तर 307 सात सारख्या गंभीर गुन्ह्यात फरार देखील होते. माझा सहकारी रामेश्वर नाईक याच्यावर आजपर्यंत साधी एन.सी सुद्धा दाखल नाही असे असतांना कुठेतरी आम्हाला अडकविण्यासाठी, बदनाम करण्यासाठी लक्ष केलं जातं आहे.परंतु आम्ही अशा खोट्या गुन्ह्यांना भीक घालणार नाही.
खोटं करणार नाही पण…जशास तसे उत्तर देऊ
सत्ताधारी पक्षात आहे म्हणून कुणी आम्हाला अडकविण्याचा प्रयत्न करत असतील तर ते चुकीचे आहे. आमची बदनामी करणार्यांना आम्ही जशास तसे उत्तर देऊ, याला त्याला पुढे करुन आम्ही काहीही खोटेनाटे करणार नाही.परंतु जे करू ते खरेच करू… आमच्याकडे खूप काही आहे असं म्हणत आ. महाजन यांनी विरोधकांना आव्हान दिलं आहे.