मुंबई – लोकसभा निवडणुकीत स्वबळावर लढून काँग्रेसला अनेक जागांवर धक्का देणाऱ्या वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी यापुढंही स्वाभिमानी बाणा कायम ठेवण्याचा निर्धार बोलून दाखवला आहे. ‘यापुढच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसला आमच्यासोबत चर्चा करायची असेल तर ती समसमान पातळीवर येऊनच करावी लागेल,’ असं आंबेडकर यांनी म्हटलं आहे.
एमआयएमसह छोट्या पक्षांची मोट बांधून प्रकाश आंबेडकरांनी स्थापन केलेल्या वंचित बहुजन आघाडीनं लोकसभा निवडणुकीत तब्बल ४१ लाखांहून अधिक मतं खेचली आहेत. इम्तियाज जलील यांच्या रूपानं ‘वंचित’चा एक खासदार निवडून आला आहे. तर, या आघाडीला मिळालेल्या मतांमुळं महाराष्ट्रात काँग्रेसला नऊ जागांवर पराभव पत्करावा लागला आहे. आघाडीचा प्रभाव काँग्रेसनंही मान्य केला आहे.
या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकरांनी आज ट्विट केलं असून यापुढंही काँग्रेसशी स्वत:च्या अटींवर चर्चा करण्याची भूमिका घेतली आहे. ‘काँग्रेसचे राजकीय गुलाम होऊन राहण्याची वेळ गेली आहे. आता त्यांना आमच्याशी समसमान पातळीवर येऊन चर्चा करावी लागेल,’ असं त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळं विधानसभा निवडणुकीत काँग्रेसशी चर्चा करण्याची वेळ आल्यास प्रकाश आंबेडकर १४४ जागांची मागणी करतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.