- विद्यार्थ्याने दिला भारतीय संस्कृती व गुरुकुल पद्धतीचा परिचय’
जळगाव दि 4. (प्रतिनिधी) – जगातील महत्त्वाच्या प्रश्नांवर आणि बदलत्या विविध प्रवाहांसाठी 27 जुलै ते 1 ऑगस्ट दरम्यान वाकायामा शहर (जपान) येथे आंतरराष्ट्रीय चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. “एशियन ऍण्ड ओशियन हायस्कूल फोरम”तर्फे आशियातील प्रमुख देशातील शाळांना यासाठी आमंत्रित करण्यात आले होते. त्यात भारतातून एकमेव अनुभूति निवासी शाळेची निवड झाली. सांस्कृतिक आदान प्रदान या उपक्रमा अंतर्गत आयोजित होणाऱ्या या चर्चासत्रात आशिया खंडातील 25 देशातील महत्त्वाच्या शाळांना आमंत्रित करण्यात आले होते. संगीत शिक्षक निखील क्षीरसागर व पार्थ पाटीदार (इ. 11 वी) यांनी अत्यंत प्रभावी असे सादरीकरण केले. 2014 पासून अनुभूती स्कूलचे शिक्षक आणि विद्यार्थी या परिषदेसाठी सातत्याने सहाव्यांदा प्रतिनिधित्व करीत आहेत.
एशियन ऍण्ड ओशियन हायस्कूल फोरमतर्फे या परिषदेत सादर होणाऱ्या विषयांचं सादरीकरण जपानमधील सर्व नागरीकांना दाखविलं जातं आणि यावरविशेष चर्चाही घडवून आणली जाते. अनुभूती स्कूलच्या पार्थ पाटीदार आणि निखील क्षीरसागर यांनी भारतातील गुरूकुल शिक्षण प्रणाली पासून आज पर्यंत झालेली शिक्षणाची वाटचाल याबाबत चर्चा केली. शिक्षण पद्धतीचा पुढे कशी प्रगती झाली या बाबत प्रभावी असे सादरीकरण केले. निखील क्षीरसागर यांनी सादर गेले गीत सर्वांसाठी विशेष आकर्षण ठरले. अनुभूती स्कूलचे शिक्षक व विद्यार्थी दोहोंचे वाकायामाचे गव्हर्नर योशिनोबु निसाका यांनी कौतुक केले. भारतीय संस्कृतीची ओळख करून देण्याचे कार्य ‘अनुभूती निवासी शाळे’ने केले याबद्दल स्कूलच्या संचालिका सौ निशा जैन, प्राचार्य जे.पी.राव यांनी अभिमान आणि समाधान व्यक्त केले.