जळगाव दि. 31 (प्रतिनिधी) – येथील माहिती अधिकार कार्यकर्ते म्हणविणारे उल्हास देवराम साबळे व पत्रकार शर्मा अशांविरुद्ध येथील जैन इरिगेशन सिस्टिम्स लि. यांनी सरकारी अधिकाऱ्यांना खोटी माहिती देणे, पैसे उकळण्याचा प्रयत्न करणे अशा गुन्ह्यांसाठी जळगाव न्यायालयात अॅड. निशांत अत्रे यांचेमार्फत फौजदारी खटला दाखल केला होता. त्यात मा. न्यायदंडाधिकारी यांनी एमआयडीसी पोलिसांना, वरील दोघांविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास करण्याचे आदेश दिले होते. त्या प्रमाणे पोलिसांनी गु.र.नं.७५/२०१८ हा दाखल करून पुढील तपास सुरु केला.
यादरम्यान साबळे वगैरे यांनी सत्र न्यायालयात रिव्हिजन अर्ज दाखल केला होता. त्यामध्ये सत्र न्यायाधीशांनी दंडाधिकारी यांचा कलम १५६(३) खालील हुकुम रद्दबातल ठरविला होता. या निर्णयाविरुद्ध मूळ फिर्यादी श्री सी एस नाईक यांनी मा. उच्च न्यायालयात अर्ज केला होता. औरंगाबाद येथील खंडपीठात मा. न्या. श्रीमती साधना जाधव यांचेपुढे या अर्जाची चौकशी झाली. त्यामध्ये मा. न्यायमूर्तींनी सत्र न्यायालयाच्या निर्णयाला अयोग्य व चुकीचे ठरवून न्यायदंडाधिकारी यांच्या मूळ आदेशानुसार पोलिसांनी या गुन्ह्यात पुढील चौकशी करावी, असा आदेश दि.२९/०७/२०१९ रोजी दिलेला आहे.
या आदेशाप्रमाणे आता साबळे व शर्मा यांचे विरुद्ध आधीच नोंदलेल्या वरील गुन्ह्याचा तपास करण्याचा पोलिसांचा मार्ग मोकळा झाला आहे. औरंगाबाद येथे मा. उच्च न्यायालयात जैन इरिगेशन तर्फे अॅड. श्री किशोर संत यांनी काम पाहिले.