- आरटीओ सीमा तपासणी नाक्यांवरून या विभागाला करोडोची वरकमाई…
- तपासणी अधिकारी झाले मस्तवाल…
- एखाद्या प्रामाणिक अधिकाऱ्यांस पैशांची मागणी केल्यास उघडे पडतात तडवी सारखे लाचखोर…
- भरमसाठ वरकमाईने अधिकारी मस्तवाल…
- एवढे पितळ उघडे पडल्यावर तरी चेक पोस्ट बंद करणार का ?
जळगाव (प्रविण सपकाळे)- सीमा तपासणी नाक्यावर नेमणुकीसाठी आरटीओ कार्यालयात निरीक्षकाकडून साडेचार लाखांच्या लाचेची मागणी करणाऱ्या प्रादेशिक परिवहन अधिकारी (आरटीओ) परवेज तडवी यास बुधवारी अटक करण्यात होती.या वरून आरटीओ विभागाच्या तपासणी नाक्यावरील वरकमाईचा पुन्हा पर्दाफाश झाला आहे त्यामुळे आता तरी आरटीओ तपासणी नाके बंदच करा अशी मागणी होत आहे.
विशेष म्हणजे, दोन महिन्यांत लाचखोर तडवीला लाच प्रकरणात दुसऱ्यांदा अटक झाली आहे.आरटीओ तपासणी नाक्यावर दररोज लाखोंची वरकमाई असते हे सर्वश्रुत आहे.या ठिकाणी “ड्युटी” असणाऱ्या त्या सर्वच तपासणी अधिकाऱ्यांची एसआयटी मार्फत चौकशी केल्यास त्यांनी जमविलेल्या बेकायदेशीर अपसंपदेची माहिती उघड होईल आणि ती माहिती सर्वांनाच अवाक करणारी असेल यात शंका नाही.
नियमानुसार चक्राकार पद्धतीने सीमा तपासणी नाक्यावर नेमणूक दिली जाते; परंतु त्यासाठी प्रादेशिक परिवहन अधिकारी परवेज खुदायारखाँ तडवी (वय ५७) यांनी २ जुलैला साडेचार लाख रुपये लाचेची मागणी केली होती. याबाबत आरटीओ कार्यालयात निरीक्षकपदी कार्यरत असलेल्या एका अधिकाऱ्याने नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुसार नाशिकच्या विभागाने तक्रारीची पडताळणी केली. त्यानंतर बुधवारी सकाळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे निरीक्षक हेमंतकुमार भामरे यांच्या पथकाने देवपुरातील दत्त मंदिर परिसरातील दत्त कॉलनी येथे तडवी यांच्या निवासस्थानी सापळा लावला. ठरल्यप्रमाणे साडेचार लाखांची रक्कम स्वीकारण्याचा प्रयत्न करताना पथकाने तडवीला रंगेहाथ पकडले. सकाळी नऊ वाजेच्या सुमारास ही कारवाई केली. त्यानंतर तडवीला देवपूर पोलिस ठाण्यात आणून गुन्हा दाखल करण्यात आला होता.यात अजून अनेक मोठे मासे आहेत याचा देखील शोध घेणे आवश्यक आहे.
आरटीओ तडवीबद्दल अनेक तक्रारी होत्या. साईनाथ एजन्सी या संस्थेमार्फत रस्ता सुरक्षा सप्ताहासाठी साहित्य पुरवण्यात आले होते. त्यांचे एक लाख ८० हजार रुपयांचे बिल जमा करण्याच्या मोबदल्यात ३० हजार रुपयांची मागणी तडवीने केली होती. या तक्रारीवरून ८ मे २०१९ रोजी धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली होती. तरी देखील लाचखोर तडवी लाच घेणे काही थांबवत नसल्याचे लक्षात येते.
आरटीओ विभागाचे तपासणी नाके येथून या तपासणी अधिकाऱ्यांमार्फत मोठी आर्थिक देवाण घेवाण चे व्यवहार होत असतात.भ्रष्टाचाराला येथूनच मोठे खतपाणी घातले जाते म्हणून हे तपासणी नाके कायमस्वरूपी बंद करावे अशी मागणी जोर धरू लागली आहे.