जळगाव, – राज्यातील आघाडीचे सरकार हे शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी कुचकामी ठरले असून पाचोरा व भडगाव तालुक्यातील शेतकरी विविध अडचणी व समस्यांनी ग्रासलेले आहेत. अशा परिस्थितीत सध्या या सरकारमध्ये सहभागी असलेले आजी-माजी आमदार हे शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत कमालीचे उदासीन असून राज्यातील सरकार सुद्धा स्थानिक शेतकऱ्यांची दखल घ्यायला तयार नाही. या पार्श्वभूमीवर येथील भारतीय जनता पार्टी तर्फे खासदार उन्मेष पाटील व आमदार राजूमामा भोळे यांच्या उपस्थितीत तालुकाध्यक्ष अमोल शिंदे व अमोल पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचा जनआक्रोश या निवेदनाच्या माध्यमातून शासन दरबारी मांडण्यात आला आहे. याबाबत पाचोरा भडगाव तालुक्यात तुन सुमारे २०,००० शेतकऱ्यांच्या स्वाक्षरी निशी निवेदन खासदार उन्मेष पाटील व आमदार राजूमामा भोळे यांनी आज जिल्हाधिकारी यांचेकडे सादर केले. त्या निवेदनात सरकारच्या ध्येय धोरणावर टीका करण्यात आली आहे व शेतकऱ्यांना तातडीने न्याय मिळण्यासाठी विविध मागण्या सुद्धा करण्यात आलेल्या आहेत
तालुकाध्यक्ष अमोल शिंदे व अमोल पाटील यांच्या तर्फे देण्यात आलेल्या जनआक्रोश निवेदनात नमूद करण्यात आले आहे की,
कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी एकमात्र उपाययोजना म्हणून लॉकडाऊन महत्वपूर्ण ठरला.मात्र शासनाचे सर्वच विभाग कोरोना भोवती केंद्रीभूत झाल्याने जगाचा पोशिंदा…शेतकरी दुर्लक्षित झाला.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वच सीमा बंद असल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रूंचा पूर शासन दरबारी पोहोचलाच नाही.
पाचोरा भडगाव तालुक्यातील शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत दयनीय आहे.कापुस मक्याचा प्रश्न आजही अनुत्तरीत आहे. विजेच्या प्रश्नांचे चटके रोजच असह्य आहेत. पीक कर्ज व पीक विमा बाबत सरकारची उदासीनता संतापजनक आहे.या सह शेती केंद्रित अनेक प्रश्नांना न्याय मिळण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी हे जनआक्रोश शेतकऱ्यांचा हे नम्र निवेदन पाचोरा-भडगाव तालुक्यातील जवळपास २०,००० शेतकऱ्यांच्या पाठिंब्या संदर्भात स्वाक्षरी सह शासन दरबारी सादर करण्यात आले आहे
निवेदनातील प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे
१) विनाविलंब जास्तीत जास्त कापूस खरेदी केंद्र वाढवून द्यावेत व शेतकऱ्यांचा घरातील शेवटचे कापसाचे बोंड सुद्धा हमीभावाने खरेदी करून तात्काळ पेमेंट मिळावे.
२) शासनाच्या एकाधिकारशाही धोरणानुसार तात्काळ मका,ज्वारी,बाजरी,हरभरा खरेदी करून २४ तासांत शेतकऱ्यांना मोबदला अदा करावा.
३) कर्ज माफीचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना त्वरित पीक कर्ज देऊन नवीन कर्ज देतांना निम्मे (५०%) कर्ज रक्कम मंजुरीची जाचक अट तात्काळ रद्द करून सर्वांना नियमानुसार संपूर्ण (१००%) कर्ज रक्कम जिल्हा मध्यवर्ती बँके सह इतर सर्व बँकांत त्वरित जमा करावी.
४) दुष्काळी अनुदानापासून वंचित हजारो शेतकरी बांधवांना तात्काळ दुष्काळी अनुदान मिळावे.
५)पाचोरा भडगाव तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना बहुप्रतिक्षित पीक विमा योजने अंतर्गत विमा काढलेल्या लाभार्थी शेतकऱ्यांना (उदा. कापूस,मका,ज्वारी इ.) त्यांची नुकसान भरपाई रक्कम तात्काळ बँक खात्यात वर्ग करावी.
६) दूध उत्पादक शेतकरी यांचा जिल्हा दूध संघाने कमी केलेला दूध भाव त्वरित वाढवून मिळावा.
७) शेतकऱ्यांच्या घराचे वीजबिल ३ महिन्यासाठी तात्काळ माफ करावे.
८) रात्री अपरात्री होणाऱ्या शेती वीजपुरवठा धोरणात तात्काळ बदल करून रात्री ऐवजी दिवसा सकाळी ७ ते संध्या.७ वाजेपर्यंत शेतीला वीजपुरवठा करण्यात यावा.
९) शेतीला वीजपुरवठा करणारे ट्रान्सफार्मर नादुरुस्त झाल्यावर विजवितरण कंपनी तर्फ कमीतकमी वेळेत दुरुस्त करून किंवा बदलून मिळावे.
१०) आगामी खरीप हंगामासाठी लागणारे बी-बियाणे युरिया व तत्सम खते, मिश्र खते वेळेवर व मुबलक प्रमाणात उपलब्ध व्हावेत.
११) ऐन पावसाळ्यात पशुधनावरील लाळ्या,खुरगुट्या,घटसर्प,फऱ्या आदी साथीच्या रोगांवरील प्रतिबंधात्मक लस व उपचार व्यवस्था वेळेवर उपलब्ध व्हावी.वरील सर्व मागण्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी निवेदनासोबत जोडलेल्या २०,००० शेतकऱ्यांनी स्वाक्षऱ्या करून आपले समर्थन दिले आहे.तरी सर्व मागण्या तातडीने मंजूर करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. अशी आग्रही मागणी भाजपा च्या वतीने करण्यात आली यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस सदाशिव पाटील,बाजार समिती सभापती सतिष शिंदे,पंचायत समिती सभापती वसंत गायकवाड, मा.सभापती बन्सीलाल पाटील,शहराध्यक्ष रमेश वाणी,सरचिटणीस गोविंद शेलार,संजय पाटील,सोमनाथ पाटील,परेश पाटील,अनिल पाटील आदी उपस्थित होते.
निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री,जिल्हाधिकारी यांचेसह
उपविभाग कार्यकारी अधिकारी तथा दंडाधिकारी, पाचोरा भाग,पाचोरा व तहसीलदार पाचोरा आणि भडगाव यांना देण्यात आल्या आहेत.