भुसावळ –नगर परिषदेतर्फे गाळ युक्त पाणी पुरवठा पाहता नागरीकांना पिण्याचे पाणी विकत घ्यावे लागत आहे. एकूणच नगर परिषदेचा कारभार नियोजन शून्य असून त्यामुळे भुसावळ शहरवासीयांनी नगर परिषदेचा कर भरायचा कि, पिण्याचे पाणी विकत घ्यायचे असा सवाल माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे यांनी केला.ते त्यांच्या सुरभी नगरातील संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी माजी नगराध्यक्ष नेमाडे यांनी पत्रपरिषदेत सत्ताधार्यांचा खरपुस समाचार घेतला.
शहराजवळून वाहणारी तापी नदी सध्या दुधडी भरुन वाहत आहे मात्र शहराला नियमित पाणी पुरवठा होत नाही.जो पाणी पुरवठा केला जात आहे तो गाळयुक्त आहे.मुळात नगर परिषद पिण्यायोग्य पाणी पुरवठा करत नाही.त्यामुळे आरओ सिस्टीम वापरुन पाणी शुध्द करावे लागते.गाळयुक्त पाण्याने आरओ यंत्रणा खराब होवून त्याला दुरुस्त करण्यासाठी दिड हजार रुपये खर्च येतो.मी नगराध्यक्ष असताना सन २०१३ साली पाण्याचा दुष्काळ होता.परंतु नगरपरिषद प्रशासनाने नियोजन करुन ठरवून जाहिर केलेल्या दिवसांआड शहरात शुध्द पाण्याचा पुरवठा केला. तेव्हाचे जे विरोधक होते ते आज सत्ताधारी आहेत परंतु तेव्हाचे आमदार आजही आमदार आहेत.तेव्हा आमदारांनी शुध्द पाण्याबद्दल पाहणी केली होती तशीच त्यांनी आजही करावी. नियमित व पुरेसा शुध्द पाण्याचा पुरवठा होत नसल्याने शहरवासीयांना पाणी विकत घेवून गरज भागवावी लागत आहे. हा खर्च सर्वसामान्यांना न परवडणारा आहे. नगरपरिषदेने अमृत योजना राबवितांना केंद्र सरकारचे निकष पाळलेले नाही. आधी पाण्याचा स्त्रोत निश्चीत करुनच जलवाहिन्या टाकावयाच्या होत्या.पण नगर परिषदेने उलटेच कामे केली आहेत.अमृत योजनेचे कोणतेही निकष पाळले जात नाहीत. शहरात वृक्षारोपण केले गेले नाही. सध्या पाण्याचे कुठलेही वेळापत्रक नाही वॉलमनचा मोबाईल बंद असतो. अधिकारी उडवाउडवीची उत्तरे देतात. अमृत योजनेमुळे रस्त्याचे तीन-तेरा झाले आहे.अमृत योजनेमुळे १५ कोटी रुपये खर्च वृक्षारोपणासाठी करणे अपेक्षित होते. मात्र एक वृक्षही लावण्यात आला नाही .नागरीकांचे आरोग्य व पर्यावरणाबद्दल प्रशासन गंभीर नसल्याचेच त्यांनी अप्रत्यक्षपणे स्पष्ट केले. मी नगरपरिषदेच्या प्रशासनाबद्दल बोललो तर प्रसिध्दीसाठी बोलत आहे असा सत्ताधारी आरोप करतात. मुळात मी संस्कृतीक वातावरणातुन आणि चळवळीतुन पुढे आलो असल्याने मला प्रसिध्दीची कुठलीही गरज नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.