मुंबई – वित्तीय सर्वसमावेशनाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारने दुर्गम भागात बँकिंग सेवा पोहचवण्यासाठी निर्देश बँकांना दिले आहेत. सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रातील बँकांना नव्या शाखा सुरु करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ज्या ठिकाणी बँकिंग सेवा पोहचली नाही, अशा ठिकाणांची माहिती सरकारने बँकांना दिली असून जवळपास १५ हजार नवीन शाखा सुरु होण्याची शक्यता आहे.
मागील काही वर्षांपासून केंद्र सरकार वित्तीय सर्वसमावेशकतेला प्राधान्य देत आहे. त्यानुसार अद्याप बँकिंग सेवा न पोहचलेल्या ठिकाणांची माहिती सरकारने बँकांना सुपूर्द केली आहे. ज्या ठिकाणी बँकिंग सेवा पोहोचली नाही, अशा खेड्यांमध्ये १५ किलोमीटर परिघाच्या आत बँक शाखा असावी, असे सरकारचे निर्देश आहेत. त्यानुसार येत्या वर्षभरात एसबीआय, बँक ऑफ बडोदा, एचडीएफसी बँक आणि आयसीआयसीआय बँक या बँका १४००० ते १५००० नवीन शाखा सुरु करतील, असे सूत्रांनी म्हटलं आहे. शाखा विस्तारामध्ये ‘एसबीआय’सारख्या मोठ्या बँकेकडून १५०० शाखा नव्याने सुरु करण्यात येतील. खासगी बँकांनी किमान ६०० ते ७०० बँका सुरु कराव्यात अशी सरकारची अपेक्षा आहे.














