नाशिक – सध्याचे राज्य सरकार हे अमर अकबर आणि अँथोनीचे सरकार आहे. यांच्यात एकवाक्यता नाही. त्यामुळे हे सरकार फार काळ चालणार नाही. महायुतीच्या काळातील अनेक चांगल्या योजनांना ब्रेक लावू पहाणारे हे ब्रेक सरकार आहे. चांगल्या योजना बंद करण्याऐवजी त्यांनी त्याहून अधिक चांगल्या योजना आणून त्याची अंमलबजावणी करावी असे आव्हान केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी शनिवारी नाशिकमध्ये महाविकास आघाडीच्या सरकारला दिले.
काही कार्यक्रमांनिमित्त नाशिक दौऱ्यावर आलेल्या दानवे यांनी भारतीय जनता पक्ष कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. ते म्हणाले, महायुतीच्या सरकारने अनेक चांगल्या योजना आणल्या. त्यांची अंमलबजावणीही सुरू केली. परंतु महाविकास आघाडीचे सरकार या योजना पुढे घेऊन जाण्याऐवजी ब्रेक करू पहाते आहे. त्यामुळे हे अमर, अकबर अँथोनींचे ब्रेक सरकार आहे. या सरकारमध्ये समाविष्ठ असलेले पक्ष आणि नेत्यांमध्ये एकवाक्यता नाही. त्यामुळे हे सरकार फार काळ टिकणार नाही असा विश्वास दानवे यांनी व्यक्त केला.














