नागपूर – केंद्र सरकारच्या सुधारित नागरिकत्व कायद्याला देशभरातील तरुणांनी केलेला जोरदार विरोधच भविष्यात सत्तांतर घडवून आणणार असल्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी नागपूर येथे बोलताना दिला. नागरिकत्व कायद्यानंतर सोशल मीडिया बंदी कायदा करण्याचाही निर्धार होत असून हा कायदा देशातील सर्वसामान्यांच्या मूलभूत अधिकारांवर गदा आणणारा आहे. त्यामुळे त्याला रोखण्यासाठी भाजपविरोधी शक्तींना एकत्रित करून ठोस कार्यक्रम राबविणार असल्याची घोषणाही पवार यांनी केली.
विधिमंडळ अधिवेशनादरम्यान नागपूर दौऱ्यावर आलेल्या शरद पवार यांनी ‘देवगिरी’ या शासकीय निवासस्थानी माध्यमांशी अनौपचारिक संवाद साधला. मोदी सरकारने नागरिकत्व सुधारणा कायदा करताना देशभरातून त्यांना विरोध होणार नाही अशी अपेक्षा केली होती. मात्र केंद्र सरकारच्या या दाव्याला देशभरातील तरुणांनी छेद दिला असून जो निषेधाचा सूर या कायद्याविरोधात उभा राहिला आहे तो निश्चितच पुढील सत्तांतर करण्यास कारणीभूत ठरेल, असा इशारा पवार यांनी यावेळी दिला. सन १९७७ मध्ये देखील तरुणांनी जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली तत्कालीन काँग्रेस सरकार विरोधात बंड पुकारले होते. तरुणांनी उभारलेल्या त्या बंडाचा शेवट सत्तांतरामध्ये झाला होता, याची आठवण पवार यांनी यावेळी करून दिली.
केंद्र सरकार आता सोशल मीडिया बंदी कायदा आणण्याचा प्रयत्न करत असल्याकडे लक्ष वेधताना पवार यांनी हा कायदा भारतीय जनतेच्या मूलभूत अधिकारांवर गदा आणणारा असल्याची टीका केली. काही कारणास्तव सोशल मीडिया नकारात्मक वाटत असला तरी त्यावर बंदी आणणे हा अंतिम उपाय नाही. या कायद्याला रोखण्यासाठी देशभरातून भाजपविरोधी सर्व पक्षांची मोट बांधून त्याविरोधात ठोस लढा उभारावा लागेल. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पूर्ण क्षमतेने या संघर्षात उतरेल, असा निर्धारही पवार यांनी व्यक्त केला.















