मुंबई – हार्बर मार्गावर राहणाऱ्या चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी असून मध्य रेल्वे दर अडीच मिनिटाला एक लोकल सोडण्याचा विचार करत आहे. त्यानुसार मध्य रेल्वेला हार्बर मार्गावर ४५०० लोकल फेऱ्या सोडाव्या लागणार आहे. सध्या या मार्गावर दिवसाला ३००० फेऱ्या सोडल्या जात आहेत. कम्युनिकेशनवर आधारीत ट्रेन कंट्रोल सिस्टमची (सीबीटीसी) पूर्णपणे अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर अशी सेवा सुरू करता येणार आहे. अशी सेवा सन २०२३ मध्ये सुरू करण्याबाबत मुंबई रेल्वे विकास महामंडळाच्या बैठकीत विचार झाला होता.
सीबीटीसी हे तंत्रज्ञान कार्यान्वित झाल्यानंतर रेल्वे मार्गावर असलेल्या सिग्नलसाठीच्या खांबांची आवश्यकता भासणार नाही. याचे कारण म्हणजे या तंत्रज्ञानाच्या आधारे लोकलमध्ये सर्व सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करणे शक्य होते. या यंत्रणेमुळे लोकलचा वेग वाढतो, तसेच दोन लोकलमधील रेल्वे ट्रॅकवरील अंतर देखील कमी होते.
नव्या सिग्नल पद्धतीबाबत माहिती देताना रेल्वे अधिकाऱ्याने सांगितले की, सध्याची वापरात असलेली सिग्नल यंत्रणा ही अतिशय जुनी पद्धत असून की बदलण्याची आवश्यकता असल्याचे एका रेल्वे अधिकाऱ्याने सांगितले. सीबीटीसी ही एक अद्ययावत यंत्रणा आहे. सध्याच्या घडीला सिग्नेल यंत्रणा रेल्वे ट्रॅकच्या आधारे चालवल्या जातात. त्यांद्वारे सिग्नलच्या खांबांपर्यंत सिग्नल पाठवले जातात. जशी ट्रेन या खांबांच्या पुढे सरकते, तसे त्या खांबावरील सिग्नल लाल, पिवळे आणि गदड पिवळे आणि हिरवे असे होतात. हे सिग्नल लोकलच्या अंतरावर अवलंबून असतात. सीबीटीसी यंत्रणेद्वारे पुढील लोकल किती अंतरावर आहे हे थेट लोकलच्या चालकाला समजते आणि त्या नुसार तो आपल्या लोकलचा वेग वाढवू शकतो किंवा कमी करू शकतो.















