नांदुर-शिंगोटे – हल्लीच्या युगात कोण कशाप्रकारे मनामध्ये खूणगाठ बांधील हे सांगता येणे अवघड आहे. असाच प्रकार सिन्नर तालुक्यातील मानोरी गावातील २१ वर्षीय तरुण सागर रामदास सानप यांनी खरा करून दाखवली आहे.
झालं असं सध्या राज्यात राजकीय उलथा पालथं सुरु आहे. निकालानंतर एक महिना उलटला तरी अद्याप राज्याला मुख्यमंत्री मिळेना. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे कार्यकर्ते असणारे सागर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व्हावे यासाठी थेट साईबाबाच्या साकडे घालण्यासाठी शिर्डी पायी रवाना झाला आहे.
गुरुवारी (दि. २१) सकाळी पाच वाजता सागर मानोरी येथून गावातील कुलदैवतांचे दर्शन घेऊन शिर्डीकडे निघाला आहे. मानोरी येथून शिर्डी पर्यंत ५०किमीचे अंतर असून शिर्डीला पोहचल्यानंतरच तो अन्न सेवन करणार असल्याचे त्यांनी सांगितले. ‘लवकरात लवकर मंत्रिमंडळ स्थापन होऊन शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा यासाठी साईबाबाला साकडे घालणार असून त्यासाठी गुरुवार हा दिवस निवडला असल्याचे तो म्हणाला.
तसेच शिवसेनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील गोरगरीब, शेतकरी वर्गाचे प्रश्न मार्गी लागावे, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी व शेतकरी वर्ग सुखी व्हावा, यासाठी पायी वारी करीत असल्याचेही त्याने सांगितले. सागरने अद्याप निम्मे अंतर कापले असून रस्त्यात त्यास अनेकजण शुभेच्छा देत आहेत.















