मुंबई – शिवसेनेच्या ५६ पैकी एकूण ३५ आमदार असंतुष्ट असल्याचा दावा राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी केला आहे. राज्यातील उद्धव ठाकरे सरकार हे ‘नाकारलेले’ सरकार असल्याचेही राणे म्हणाले. राज्यात सत्ता स्थानपेसाठी शिवसेना , राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस पक्षाने ५ आठवड्यांचा कालावधी घेतला असल्याचेही ते म्हणाले.
भाजप सत्तेत परत येईल’
भारतीय जनता पक्ष पुन्हा सत्तेत परत येईल असेही नारायण राणे यांनी म्हटले आहे. भारतीय जनता पक्षाकडे १०५ आमदारांचे संख्याबळ आहे. शिवसेनेकडे फक्त ५६ इतके संख्याबळ आहे. त्यांपैकी ३५ आमदार नाराज आहेत, असे म्हणत राणे यांनी हे आमदार भारतीय जनता पक्षाकडे येऊ शकतात, असे संकेत दिले आहेत. राज्यातील शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचा ठाकरे सरकारचा दावाही खोटा असल्याची टीका राणे यांनी केलीय.
उद्धव ठाकरेंना सरकार चालवता येत नाही’
नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या औरंगाबाद दौऱ्यावरही टीका केली. उद्धव हे औरंगाबादमध्ये कोणतीही घोषणा न करताच परतले. सरकार कसे चालवावे हे उद्धव ठाकरे यांनी माहीत नाही, अशा शब्दांत राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली. ज्यांनी सरकार स्थापन करण्यासाठीच जेथे ५ आठवडे घेतले, ते कसे सरकार चालवणार अशा शब्दांत राणे यांनी ठाकरे यांची खिल्लीही उडवली. भारतीय जनता पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना जवळ येण्याबाबत विचारलेल्या प्रश्नाला मात्र राणे यांनी स्पष्ट शब्दांत उत्तर दिले नाही. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्षच यावर बोलतील असे राणे म्हणाले.