नवी दिल्लीः – पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे देशातील लोकांची दिशाभूल करीत आहे. केंद्रातील मोदी सरकार संविधानाला कमकुवत करीत आहे, सरकारकडून लोकांमध्ये चुकीची माहिती पसरवली जात आहे. लोकांचे सांप्रादायिकतेच्या आधारावर विभाजन केले जात आहे,अशा शब्दांत काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी आज मोदी-शहा यांच्यावर हल्ला चढवला. सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली आज विरोधी पक्ष नेत्यांची बैठक पार पडली. त्यावेळी त्या बोलत होत्या. या बैठकीला देशभरातील सर्वपक्षीय नेत्यांची उपस्थिती होती.
आज झालेल्या बैठकीत अनेक मुद्द्यावर चर्चा करण्यात आली. यात नागरिकत्व संशोधन विधेयक (सीएए) या विरोधात झालेले आंदोलन आणि अनेक विद्यापीठ परिसरात झालेल्या हिंसाचारानंतर उद्भवलेली परिस्थिती, देशातील आर्थिक मंदी यासारख्या मुद्द्यावर चर्चा करण्यात आली. या बैठकीत सोनिया गांधी यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्री हे देशातील लोकांची दिशाभूल करीत आहेत. या दोन्ही नेत्यांनी काही आठवड्यापूर्वी केलेल्या स्वतःच्या विधानाचे त्यांनीच खंडण केले आहे, असे सोनिया गांधी यावेळी म्हणाल्या. मोदी-शहा यांच्याकडून आक्षेपार्ह विधाने करण्यात आली असून त्यांनी असे करणे कायम ठेवल्याचेही सोनिया गांधी म्हणाल्या . केंद्र सरकार संविधानाला कमकुवत करण्याचा प्रयत्न करीत आहे. तसेच केंद्र सरकारकडून सत्तेचा दुरूपयोग केला जात आहे. याविरोधात देशभरात आंदोलन करण्यात येत आहे. सीएए आणि एनआरसी हे तत्कालिक कारण आहे. परंतु, यामुळे व्यापक नैराश्य आले आहे. लोकांमध्ये प्रचंड राग आहे. उत्तर प्रदेश आणि दिल्ली पोलिसांची वागणूक ही पक्षपाती आणि क्रूर होती, असेही सोनिया गांधी म्हणाल्या.