मुंबई – महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं नवं सरकार स्थापन झालं आणि शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस आघाडीच्या सहा मंत्र्यांचा शपथविधीही झाला. या मंत्र्यांना शासकीय बंगल्यांचे वाटप करण्यात आले आहे. मुख्यमंत्र्याचा वर्षा बंगला उद्धव ठाकरेंकडे आला आहे तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना मलबार हिल येथील ‘सागर’ बंगला देण्यात आला आहे.
मुख्यमंत्र्यांसाठी असणारा ‘वर्षा’ बंगला उद्धव ठाकरे यांना सुपूर्द करण्यात आला आहे. छगन भुजबळ यांना ‘रामटेक’ हा त्यांचा ते मंत्री असतानाचाच बंगला पुन्हा मिळाला आहे. जयंत पाटील यांना ‘सेवासदन’ बंगला देण्यात आला आहे तर एकनाथ शिंदे यांना ‘रॉयलस्टोन’ बंगला देण्यात आला आहे. मंत्रीपदावर असेपर्यंत मंत्र्यांना या शासकीय बंगल्यांमध्ये निवास करता येतो. पदमुक्त झाल्यानंतर वाटप केलेले निवासस्थान १५ दिवसांच्या कालावधीत रिक्त करून देणं बंधनकारक असतं.














