- उशिराने गुन्हा दाखल करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यावर कारवाई व्हावी, शिवसेनेची मागणी

पाचोरा (प्रतिनिधी) 26 – पिंपळगाव हरे. (ता पाचोरा) पोलीस ठाण्यात तानाजी पाटील यांनी अमोल शिंदे यांच्या विरोधात दिलेली तक्रार गंभीर स्वरूपाची असताना देखील सदर तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करण्यास विलंब करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांची चौकशी करून कारवाई व्हावी अशी मागणी शिवसेनेच्या वतीने पत्रकार परिषदेत करण्यात आली.
पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यात तानाजी पाटील यांनी अमोल शिंदे यांनी दिलेल्या धमकी प्रकरणी तसेच त्यांच्या पत्नी संदर्भात केलेल्या आक्षेपार्ह विधानाबाबत स्पष्टीकरण करण्यासाठी व गुन्हा दाखल करण्यास विलंब झाल्याप्रकरणी शिवतीर्थ या शिवसेना कार्यालयात गुरुवार ता 26 रोजी सायंकाळी शेतकरी सेनेचे जिल्हा प्रमुख अरुण पाटील व ॲड अभय पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली .
यावेळी उपजिल्हाप्रमुख अॅड दिनकर देवरे, तक्रारदार तानाजी पाटील, दीपकसिंह राजपूत, उद्धव मराठे, जावेद शेख उपस्थित होते.
यावेळी ॲड अभय पाटील यांनी स्पष्ट केले की, आंबेवडगाव ग्रामपंचायतीने 14 व्या वित्त आयोगा अंतर्गत केलेल्या विकासकामांच्या उद्घाटना संदर्भात कुऱ्हाड बु. (ता पाचोरा) येथील तानाजी पाटील यांनी प्रतिक्रिया दिली होती. त्याचा राग येऊन संशयित अमोल शिंदे यांनी तानाजी पाटील यांना भ्रमणध्वनी वर फोन करून त्यांच्याशी संवाद साधताना त्यांच्या पत्नी संदर्भात आक्षेपार्ह वक्तव्य करत जीवे ठार मारण्याची वेगळ्या भाषेत धमकी दिली व मी कुणाला घाबरत नाही कुठेही तक्रार करा असेही म्हटले. ही संभाषणाची ध्वनिफीत व लेखी तक्रार बुधवार ता 25 रोजी पिंपळगाव हरेश्वर पोलिसांकडे दाखल करण्यात आली .पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास विलंब करून ता.26 रोजी कलम 509 व 506 नुसार गुन्हा नोंदवला. गुन्हा विलंबाने नोंदवण्या मागचे कारण काय ? याबाबत चौकशी होऊन संबंधित पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी. शिवसेना असा कोणताही प्रकार अथवा कोणाची दहशत अथवा दबाव खपून घेणार नाही . तानाजी पाटील व त्यांचे कुटुंबीय प्रचंड घाबरले असून पोलिसांनी तानाजी पाटील व त्यांच्या कुटुंबियांना त्वरित संरक्षण द्यावे अशी मागणी पत्रकार परिषदेत करण्यात आली.















