दिल्ली, – तत्कालीन तत्कालीन पोलीस आयुक्त परमबिर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवलेल्या पत्रात गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर लावण्यात आलेले आरोप गंभीर असल्याचं राष्ट्रवादीचे नेते खा. शरद पवार यांनी आज दिल्ली येथील पत्रकार परिषदेत म्हटलं आहे.
त्या पत्रावर बोलतांना शरद पवार म्हणाले की मुख्यमंत्री यांना पाठवण्यात आलेल्या पत्रावर परमबीर सिंग यांची स्वाक्षरी देखील नाही. पैसे कसे दिले याचा उल्लेख नाही. याबाबत गृहमंत्री यांचं म्हणणं ऐकून घेतले जाईल.या संदर्भातील सर्व अधिकार मुख्यमंत्री यांच्या कडे आहेत, मुख्यमंत्र्यांनी योग्य ती चौकशी करुन निर्णय घ्यावा असंही ते यावेळी म्हणाले.
तत्कालीन पोलीस आयुक्त परमबिर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आठ पानाचे पत्र देऊन राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले असून हे पत्र ‘लेटर बॉम्ब’ ठरल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहलेल्या पत्रात पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी आरोप केला आहे की गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांना 100 कोटी रुपये वसुलीचे टार्गेट दिले होते.एवढा गंभीर आरोप केल्याने राजकीय वर्तुळात भूकंप झाला असून गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी आज दिवसभर विरोधकांनी लावून धरल्याचे दिसून आले.
याबाबत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सर्व आरोप फेटाळले असून मुख्यमंत्री कार्यालयाने देखील परमबीर सिंग यांची पत्रावर स्वाक्षरी नसल्याने त्या पत्राची शहानिशा करण्यात येईल असं म्हटलं आहे.















