औरंगाबाद – संपूर्ण जग कोरोना महामारीने एका महाभयंकर संकटात सापडले आहे. जसा या महामारीचा परिणाम सर्व क्षेत्रावर झाला आहे, तसाच पत्रकारितेवरही झाला आहे. तेव्हा पत्रकारांनी सर्व प्रथम हे समजून घेतले पाहिजे आणि धीर न सोडता आहे त्या परिस्थितीत आपले समाज प्रबोधनाचे कार्य सुरू ठेवले पाहिजे. संकटे येतात आणि जातात. अशा संकटात आपल्या माणसांना सांभाळणे, धीर देणे व शक्य होईल ती मदत संघटनेच्या माध्यमातून आपण करत आहोत. मित्रांनो धीर सोडू नका, हे ही दिवस जातील, असा आशावाद महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेश अध्यक्ष वसंतराव मुंडे यांनी व्यक्त केला.
कोरोनाचे संकट आणि पत्रकारांच्या अडचणी समजून घेण्यासाठी वसंतराव मुंडे महाराष्ट्रातील संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी जिल्ह्यावार संवाद साधत आहेत. सोमवारी औरंगाबाद जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांबरोबर त्यांनी संवाद साधून समस्या जाणून घेतल्या. पत्रकार बांधव भलामोठा पगार नसतांनाही पत्रकारिता करत राष्ट्रीय सेवा करून कोरोना योद्धा म्हणून काम करित आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या आर्थिक पाँकेजमध्ये पत्रकारांचा कुठेही उल्लेख नाही.त्यामूळे पत्रकारांसासाठी आर्थिक पॅकेज करिता शासनाकडे पाठपुरावा करत आहेत. तसेच कोरोनाचे संकट लगेच संपणार नाही.तेव्हा पत्रकारांनी आपली व आपल्या परिवाराची काळजी घेत बातमी संकलन करावे.धोक्यात येऊन कुठलेही कार्य करू नये. कुटुंब प्रमुख म्हणून आपली जबाबदारी मोठी आहे. याचे भान ठेऊन आरोग्य विभागाच्या गाईडलाईंचे तंतोतंत पालन करत लोकशाहीच्या चौथ्या शक्तीचे कार्य सुरू ठेवले पाहिजे. आपल्या सोबत काम करणाऱ्या बांधवांना सामाजिक दायित्व म्हणून संघटनेच्या माध्यमातून मदत देखील करावी, असे अवाहन त्यांनी सर्व पत्रकारांना केले. आपल्या संघटनेच्या माध्यमातून शासनाकडे पत्रकारांच्या विविध मागण्यांचा पाठपुरावा सुरुच आहे.
सध्या अनेक पत्रकारांना आर्थिक परिस्थिती भेडसावत आहे. हे संकट काही प्रमाणात असमानी तर काही प्रमाणात सुलतानी आहे. काही दैनिकांचे मालक पत्रकारांना वेळेवर व पूर्ण पगार देत नसल्याच्या अनेक तक्रारी माझ्याकडे येत आहेत. यापुढे पत्रकारानी अशा तक्रारी लेखी रूपात पाठवल्या पाहिजे. संघटनेच्या माध्यमातून आपण यावर 100 टक्के तोडगा काढू, असे आश्वासनही शेवटी वसंतराव मुंडे यांनी दिले.चर्चेत सहभागी झालेल्या प्रत्येकाने थेट प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे यांच्याशी संवाद साधत आपले विचार बिनधास्तपणे मांडले आणि श्री मुंडे यांनीही सर्वांना समाधानकारक उतरे दिली.
या चर्चेत संघटनेचे जिल्हा अध्यक्ष डॉ. प्रभू गोरे, जिल्हा संघटक विलास शिंगी, जिल्हा उपाध्यक्ष अशोक खाडे, सचिव दिपक म्हसके, कोषाध्यक्ष मुकेश मुंदडा, महानगर उपाध्यक्ष हनुमंत कोल्हे, सहकोषाधक्ष सदाशिव गवारे, प्रसिद्धी प्रमूख सचिन अंभोरे, जगदीश वेदपाठक, सदस्य शिवानंद चकरवार, सागर भोसले यांनी सहभाग घेतला होता.