मुंबई- कायद्याची प्रक्रिया पूर्ण करुन चौकात फाशी दिली असती तर लोकांच्या मनात भीती निर्माण झाली असती. न्याय झालेला आहे परंतु ही पद्धत अन्यायकारक आहे असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि मुंबई अध्यक्ष आमदार नवाब मलिक यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले आहे. हैदराबाद घटनेतील आरोपींचा आज एन्काउंटर करण्यात आला. त्यावर बोलताना नवाब मलिक यांनी आपलं मत मांडलं.
हैदराबादमध्ये जी घटना घडली होती. त्या घटनेतील चार आरोपींचा आज एन्काऊंटर करण्यात आला. न्याय देण्याची ही पद्धत नाही. अन्यायकारक पद्धतीने न्याय देणे योग्य नाही असेही नवाब मलिक म्हणाले. या एन्काउंटरचे पडसाद देशभर उमटत आहेत. सामान्य नागरिकांनी हैदराबाद पोलिसांच्या धाडसाचे कौतुक केले आहे. पीडितेला तत्काळ न्याय मिळाल्याची लोकांची भावना आहे. मात्र, बुद्धिजीवी वर्गात या घटनेबाबत चिंता व्यक्त करण्यात येत आहे. विविध पक्षांच्या नेत्यांनीही या घटनेबाबत आक्षेप घेतला आहे.














