प्रयागराज : उत्तर प्रदेशातील प्रयागराजमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. प्रयागराजच्या गंगापार परिसरातून पुन्हा एकदा सामूहिक हत्येची घटना समोर आली असून, येथे एकाच कुटुंबातील ५ जणांची हत्या करण्यात आली आहे. प्राथमिक माहितीनुसार, दगड विटांनी हल्ला करुन निर्दयीपणे पाच जणांचा जीव घेण्यात आला. या हत्याकांडानंतर मारेकऱ्यांनी या कुटुंबीयांचं घरही जाळून टाकलंय. ही थरारक घटना उघडकीस आल्यानंतर प्रयागराजमध्ये खळबळ उडाली असून पोलीसांनीही घटनास्थळी धाव घेतली.
हत्येचे कारण अस्पष्ट
मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण थरवई पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खेवरजपूर गावचे आहे. हत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. माहितीनंतर वरिष्ठ अधिकारीही घटनास्थळी पोहोचले आहेत.
मृतांचे नाव
या सामूहिक हत्येमध्ये राजकुमार यादव मुलगा राम अवतार वय 55 वर्षे, कुसुम पत्नी राजकुमार वय 50 वर्षे, मनीषा मुलगी राजकुमार वय 25 वर्षे, सविता पत्नी सुनील वय 30 वर्षे आणि मीनाक्षी मुलगी सुनील वय 2 वर्षे यांचा खून करण्यात आला आहे.
16 एप्रिल रोजी एकाच कुटुंबातील 5 जणांचे मृतदेह सापडले होते.
16 एप्रिललाही प्रयागराज जिल्ह्यातील गंगापार नवाबगंज पोलीस स्टेशन हद्दीतील खगलपूर गावात एकाच कुटुंबातील पाच जणांचे मृतदेह घरात आढळून आले होते. कुटुंबप्रमुख राहुलचा मृतदेह साडीच्या फासाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला असून त्याच्या शरीरावर कोणत्याही जखमेच्या खुणा नाहीत. राहुल व्यतिरिक्त, कुटुंबातील इतर चार सदस्य – राहुलची पत्नी आणि तीन मुली – त्यांच्या मानेवर धारदार शस्त्राचे वार आढळून आले, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.















