जळगाव – देशाच्या जडणघडणीत शिक्षकांची महत्वाची भूमिका आहे. भारताला 2047 पर्यंत महासत्ता करण्यासाठी सकारात्मक प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यासाठी केवळ विद्यार्थ्यांनाच मार्गदर्शन करणे गरजेचे नसून प्राध्यापकांचे सकारात्मक प्रयत्न देखील महत्त्वाचे ठरणार आहे. आज आपण केवळ भारतीय नागरिक नसून विश्व नागरिक झालो आहोत. खऱ्या अर्थाने वसुधैव कुटुंबकम ही संज्ञा प्रत्यक्षात येत असल्याचे प्रतिपादन माजी खासदार पूनम महाजन यांनी केले.
प्राध्यापकांच्या वतीने शहरातील हॉटेल प्रेसिडेंटमध्ये आयोजित ‘भारत महासत्ता निर्मितीत आपला सहभाग’ या विषयावरील संबोधनात त्यांनी शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांसह प्राध्यापकांशी संवाद साधला, त्यात त्या बोलत होत्या. व्यासपीठावर जिल्हा मराठी शिक्षण संघटनेचे अध्यक्ष शालिग्राम भिरुड, एन- मुक्टो प्राध्यापक संघटनेचे अध्यक्ष डॉ नितीन बारी, गोदावरी फाउंडेशनच्या संचालिका डॉ. केतकी पाटील उपस्थित होत्या.
पूनम महाजन म्हणाल्या, आई- वडिलांच्या नंतर प्रत्येकाचा गुरु हा शिक्षक, प्राध्यापक असतो. मातापित्यांपेक्षाही विद्यार्थ्यांना घडविण्याची जबाबदारी अध्यापकांवर अधिक असते. आपण समाज घडविणारी लोकं आहात. आदर्श समाज घडला तर आदर्श राष्ट्र घडेल. पंतप्रधान मोदींनी भारताला महासत्ता बनविण्याचे स्वप्न पाहिलेय, त्यादृष्टीने आपल्या देशाची वाटचाल सुरु आहे. पण, केवळ मोदींनी स्वप्न पाहून चालणार नाही, ते आपल्याला प्रत्येकाला पाहावे लागेल. ‘छोडो कल की बातें कल की बात पुरानी’ या गीताची आठवण करन देत जुनं-नवं एकत्र करुन, संस्कृतीला आधुनिकतेची जोड देऊन प्रयत्न करावे लागतील. तरुणांमधील ऊर्जेला सकारात्मक दिशा दाखविण्याचे कार्य प्राध्यापकांना करावे लागेल, असे आवाहन महाजन यांनी केले.
संबोधनानंतर प्राध्यापकांनी विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी उत्तरे दिली. प्रास्ताविक प्राचार्य डॉ विजयकुमार पाटील ह्यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. प्रशांत वारके यांनी तर आभार प्रदर्शन प्राजक्ता पाटील यांनी केले.









