नवी दिल्ली – दिल्लीतील हिंसाचार हा पूर्वनियोजित कट असून दिल्लीत उद्भवलेल्या स्थितीला केंद्र सरकार, गृहमंत्री अमित शहा जबाबदार असून ही जबाबदारी स्वीकारत गृहमंत्री अमित शहा यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी काँग्रेस पक्षाने केली आहे. दिल्लीत शांतता राखण्यात दिल्लीचे मुख्यमंत्रीही अयशस्वी ठरले असून त्यांनी जबाबदारी न घेतल्यानेच दिल्लीत अशी स्थिती झाल्याचे सांगत काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केंद्र सरकार, गृहमंत्री अमित शहा आणि दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला. काँग्रेस पक्षाच्या कार्य समितीच्या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत सोनिया गांधी बोलत होत्या.
भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी भावना भडकतील अशी भाषणे करत द्वेष पसरवण्याचे काम केले असा थेट आरोप सोनिया गांधी यांनी पत्रकार परिषदेत केला. भाजपच्या नेत्यांनी दिल्लीतील पोलिसांनी तीन दिवसांची मुदत देत, यानंतर जे काही होईल त्याबद्दल आम्हाला सांगू नका अशी चिथावणीखोर वक्तव्ये केली, असे सांगत या हिंसाचारात २० पेक्षा अधिक लोकांचे बळी गेल्याचे सोनिया गांधी म्हणाल्या.
दिल्लीतील पोलिस ७२ तास हातावर हात घेऊन बसून राहिले असे सांगत या हिंसाचारात २० लोकांचे बळी गेल्याचे गांधी यांनी सांगितले. बळी गेलेल्यांमध्ये हेड कॉन्स्टेबलचाही समावेश असल्याचे त्या म्हणाल्या. शेकडो लोक हॉस्पिटलमध्ये आहेत. ईशान्य दिल्लीतील अनेक भागांमध्ये हिंसाचार सुरूच असल्याची माहितीही त्यानी दिली.















