जळगाव (प्रतिनिधी) जळगाव ग्रामीण मतदारसंघात ज्या टपरी वाल्याला शिवसेनेने आमदार केलं, मंत्री केलं तरी देखील त्यांनी गद्दारी केली परंतु जनता गद्दारांसोबत नसून निष्ठावंत शिवसेनेसोबत आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत मशाल चिन्हावर निवडणूक लढविणारा उमेदवारच निवडून येणार आहे, असे वक्तव्य खासदार संजय राऊत यांनी धरणगाव येथील मेळाव्यात केले होते. एवढेच नव्हे तर, आपल्या भाषणातून त्यांनी शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांचा आपल्या भाषणातून उल्लेख केला. त्यामुळे जळगाव ग्रामीण विधानसभा मतदार संघातून गुलाबराव वाघ यांच्या उमेदवारीवर खासदार राऊत यांनी एकप्रकारे शिक्कामोर्तब केल्याचे बोलले जात आहे.
जळगाव ग्रामीणमध्येच नव्हे तर जिल्ह्यात टिकवून ठेवली संघटना !
शिवसेनेमध्ये गुलाबराव वाघ हे मंत्री गुलाबराव पाटील यांच्या पेक्षा सिनिअर होते. परंतू विधानसभेची उमेदवारी श्री. पाटील यांना सतत मिळत गेली. परंतू तरीदेखील गुलाबराव वाघ यांनी प्रामाणिकपणे काम करून शिवसेनेचा उमेदवार निवडणूक आणण्यात महत्वाची भूमिका बजावली. पक्ष फुटीनंतरही वाघ यांनी आपली निष्टा ढासळू दिली नाही. अडचणीच्या काळात पक्ष संघटना जळगाव ग्रामीण विधानसभा मतदार संघातच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात टिकवून ठेवली. विविध आंदोलन, प्रत्येक कार्यकर्त्याच्या अडचणीच्या काळात धावून जाण्यासाठी गुलाबराव वाघ यांची ख्याती आहे.
शिवसेनेच्या अंतर्गत सर्वेक्षणातही गुलाबराव वाघ यांचे नाव आले समोर !
जळगाव ग्रामीण मतदार संघातील प्रत्येक गावात गुलाबराव वाघ यांचा संपर्क आहे. लग्न, अंत्ययात्रेला ते हजर असतात. तसेच मागील २०/२५ वर्षापासून शिवसेनेशी एकनिष्ठ आणि विधानसभेची न मिळालेली संधीमुळे वाघ यांच्याविषयी मोठी सहानभूती आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शिवसेना ठाकरे गटाने जळगाव जिल्ह्यात आपला एक गोपनीय सर्वे केला होता. त्यानुसार जळगाव ग्रामीण, पाचोरा-भडगाव,चाळीसगाव या ठिकाणी उमेदवार दिल्यास चांगली लढत दिली जाऊ शकते. जळगाव ग्रामीणमध्ये गुलाबराव वाघ, पाचोरा-भडगावमध्ये वैशालीताई सूर्यवंशी तर चाळीसगावमध्ये उन्मेष पाटील यांचे नाव सर्वेक्षणातून समोर आले होते.
… म्हणून गुलाबराव वाघ यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब !
धरणगावातील जी.एस कॉटन येथे नुकताच शिवसंवाद भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात आगामी विधानसभा निवडणुकीत मशाल चिन्हावर निवडणूक लढविणारा उमेदवारच निवडून येणार आहे, असे वक्तव्य खासदार संजय राऊत यांनी केले. तसेच आपल्या भाषणातून त्यांनी दोन-तीन वेळेस गुलाबराव वाघ यांच्या नावाचा उल्लेख केला. त्यामुळे गुलाबराव वाघ यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब असल्याचा अंदाज राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत. दरम्यान, गुलाबराव वाघ यांना उमेदवारी मिळाल्यास शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी रंगतदार आणि काटे की टक्कर या ठिकाणी बघावयास मिळणार आहे.









