मुंबई: भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड होऊन तीन महिनेही होत नाहीत तोच चंद्रकांत पाटील यांची या पदावरून उचलबांगडी करण्यात येणार आहे. येत्या ३१ डिसेंबरपर्यंत नव्या प्रदेशाध्यक्षांची नियुक्ती करण्याचा निर्णय आज झालेल्या भाजपच्या बैठकीत घेण्यात आला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज भाजपच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीत येत्या ३१ डिसेंबर रोजी नवा प्रदेशाध्यक्ष निवडण्याचा निर्णय घेण्यात आला. स्वत: मुनगंटीवार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना ही माहिती दिली. पाटील यांना प्रदेशाध्यपदी नियुक्ती होऊन अवघे तीन महिनेही झालेले नसताना त्यांची या पदावरून उचलबांगडी का करण्यात येत आहे? असा सवाल पत्रकारांनी मुनगंटीवार यांना केला. त्यावर ही राष्ट्रीय पातळीवरची प्रक्रिया आहे. प्रदेशाध्यक्षांचा कार्यकाळ संपल्याने नव्या अध्यक्षाची नियुक्ती करण्यात येणार आहे. त्याबद्दल कोणीही चिंता करू नये, असं मुनगंटीवार यांनी सांगितलं.
दरम्यान, चंद्रकांत पाटील यांच्याकडून प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी काढून घेण्यात येत असल्याने त्यांच्याकडे मुख्यमंत्रिपदाची धुरा दिली जाणार असल्याची जोरदार चर्चा आहे. उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याऐवजी पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ राज्यपालांना भेटणार असल्याने या चर्चेला अधिक उधाण आलं आहे. त्यामुळे राज्याला आगामी काळात मुख्यमंत्रिपदाचा नवा चेहरा पाह्यला मिळणार असल्याचे संकेत मिळत आहे.















