- गाळण येथील महिलांचा एल्गार यशस्वी

पाचोरा, (प्रतिनिधी) – भारतीय संस्कृतीत नारीशक्ती चे महत्त्व आणि महात्म्य अगाध व अवर्णनीय असल्याचा सूर सतत कानी पडत असतो. एखादी घटना अथवा कृत्या विरोधी नारी शक्तीने पदर खोचल्यास त्याचे सकारात्मक परिणाम समोर येत असल्याचे आपण अनेकदा पाहतो, ऐकतो, अथवा अनुभव देखील असाच प्रकार गाळण परीसरातील ग्रामस्थांना तसेच महसूल व पोलिस अधिकाऱ्यांना अनुभवायला मिळाला. गावात हातभट्टीची दारू तयार करून त्याची विक्री करणे बंद करावे या मागणीसाठी महिलांनी संघटितपणे केलेला एल्गार यशस्वी ठरला असून या गावातील हातभट्टीची दारू तयार करणाऱ्या व्यक्तींनीच साऱ्या गावासमोर दारू तयार न करण्याची शपथ घेतली आहे. यामुळे गाव व्यसनमुक्ती कडे यशस्वी वाटचाल करण्यास सज्ज झाले आहे. विशेष म्हणजे हा सारा प्रकार यशस्वी व्हावा म्हणून पोलीस मित्र पथक तयार करण्यात आले आहे.
पाचोरा तालुक्यातील गाळण खुर्द, गाळण बुद्रुक ,हनुमानवाडी, विष्णुनगर या गावांमध्ये हातभट्टीची दारू खुलेआम पणे तयार करून त्याची विक्री केली जात असल्याने बहुतांश जण दारूच्या व्यसनाच्या आहारी गेले. कष्टकरी व गोरगरीब कुटुंबातील तरुण मुलांनाही दारूचे व्यसन जडल्याने त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त होण्याची भीती निर्माण झाली .अनेकांना दारुमुळे गंभीर आजारही जडले .तसेच गावातील व अनेक कुटुंबातील शांततामय जीवनही धोक्यात आले. त्यामुळे हातभट्टीची दारू पाडणे व त्याची विक्री करणे बंद करावे अशी मागणी गावातील महिलांनी दारू विक्रेत्यांकडे केली. परंतु प्रथम या महिलांना या विक्रेत्यांकडून धमक्या देत भीती दाखवण्यात आली. ग्रामपंचायतीने ठराव करून देखील त्याचा फारसा उपयोग झाला नाही. शासनाच्या दारूबंदी विभागाकडे या संदर्भात सुज्ञ ग्रामस्थांनी व महिलांनी तक्रारी केल्या परंतु आमचे कोणीही काही करून घेणार नाही अशा अविर्भावात हे दारू विक्रेते वावरत होते .
एकूणच या सर्व परिस्थितीचा विपरीत परिणाम व मनस्ताप गावातील महिलांना सोसावा लागत असल्याने महिला शक्ती संघटित झाली व त्यांनी गावातील दारू हद्दपार करण्यासाठी अक्षरशः पदर खोचला. हिरकणी गटाच्या संस्थापक जिजाबाई राठोड यांच्या नेतृत्वाखाली रेखा राठोड, सगुणा राठोड, कमल राठोड, सुमन राठोड, लताबाई राठोड, बेबाबाई राठोड, कविता राठोड ,सुरेखा राठोड, दाळीबाई राठोड, संताबाई राठोड, सागरबाई राठोड,निकीबाई राठोड यांच्यासह बंजारा समाजाच्या अनेक महिलांनी पाचोरा पोलिस ठाण्यात धडकत पोलीस अधिकाऱ्यांना निवेदन दिले. तसेच उपजिल्हाधिकारी राजेंद्र कचरे यांनाही निवेदन देऊन हात भट्टी दारु मुळे सोसावा लागणारा मनस्ताप त्यांच्यापुढे व्यक्त केला.
अधिकाऱ्यांनी घेतली बैठक
महिला शक्तीच्या या एल्गारांमुळे महसूल व पोलिस विभागाला विभागाची झोप उडाली. महिलांनी दिलेले निवेदन व व्यक्त केलेली आपबिती विचारात घेऊन उपजिल्हाधिकारी राजेंद्र कचरे यांनी उपनिरीक्षक विजया वसावे, पुरवठा नायब तहसीलदार पुनम थोरात ,मंडळ अधिकारी दिलीप पवार यांना आदेश देऊन हातभट्टीची दारू तयार करणे व विक्री करणे याबाबत कठोर कारवाईचा इशारा दिला. या अधिकाऱ्यांनी विष्णुनगर येथे बैठक घेऊन या बैठकीत महिला, गावातील लोकप्रतिनिधी व हात भट्टीची दारू तयार करणारे यांना एकत्रित केले. दारू तयार करणाऱ्यांनी प्रथम अधिकारी व महिलांसमोर हुज्जत घालण्याचा प्रयत्न केला .अर्धनग्न होण्याची भीती दाखवत दहशत निर्माण केली. पोलीस निरीक्षक अनिल शिंदे हे यांनी हा प्रकार गांभीर्याने घेतला. कायदा व कायदा मोडल्यामूळे होणारे परिणाम बैठकीत मांडले. त्यामुळे हूज्जत घालणाऱ्या दारू पाडणाऱ्यांनी नमते घेतले. अधिकारी, ग्रामस्थ, महिला व दारू पाडणारे यांचेसह जिजाबाई राठोड, सरपंच संतोष राठोड ,सविता पाटील, कल्पना राठोड ,सरला पाटील, मिरा राठोड, शांताबाई राठोड, कुमुदिनी राठोड,डॉ विजयसिंग राजपूत ,बी के पाटील हे या बैठकीत उपस्थित होते. दारू विक्रेत्यांनी घेतली शपथ=
या बैठकीत गाळण बुद्रुक, गाळण खुर्द ,विष्णुनगर, हनुमानवाडी या गावात हातभट्टीची दारू पाडून त्याची विक्री करणाऱ्यांचा कठोर समाचार घेण्याची तंबी दिली तसेच दारूच्या व्यसनाच्या आहारी गेल्यामुळे गावाचे होणारे नुकसान व तरुण पिढीचे नष्ट होत असलेले भविष्य बैठकीत मांडले. त्यामुळे दारू पाडणारे व विक्री करणारे हे देखील अत्यंत भावनिक झाले व त्यांनी यापुढे दारू न पाडण्याची जाहीरपणे शपथ घेतली व मिळेल ते काम करून आपला उदरनिर्वाह चालविण्याचा संकल्प केला .
पोलिस मित्र पथक
या संपूर्ण प्रकारावर लक्ष व नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस मित्र पथक ही तयार करण्यात आले. यात पोलीस पाटील विनोद राठोड, आकाश राठोड, मनोज राठोड, निंबा राठोड, साजन चव्हाण ,दीपक चव्हाण ,देवेंद्र पवार, अमोल राठोड, कौतिक राठोड, योजन राठोड ,सतीश राठोड यांचा समावेश करण्यात आला.
या प्रकारामुळे गाळण परिसरातून हातभट्टीची दारू हद्दपार होण्याचे व व्यसनमुक्तीचे सुचिन्ह निर्माण झाले आहे .महिलांनी केलेली दारूबंदीची मागणी ती मागणी विचारात घेऊन महसूल व पोलिस अधिकाऱ्यांनी उचललेले पाऊल आणि केलेली कार्यवाही यामुळे हातभट्टीची दारू हद्दपार झाल्याने अधिकाऱ्यांनाही धन्यवाद दिले जात आहेत.














