झारखंड- कर्नाटकातील पोटनिवडणुकांमध्ये भाजपला मिळालेल्या दणदणीत विजयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे. ‘जनमताचा अपमान करून मागच्या दारानं चोरांप्रमाणं सरकार स्थापन करणाऱ्या काँग्रेसला कर्नाटकच्या जनतेनं धडा शिकवला आहे,’ अशी जोरदार टीका करतानाच, मोदींनी महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापणाऱ्या शिवसेनेलाही अप्रत्यक्षपणे टोला हाणला आहे.
झारखंडमधील बरही येथे एका प्रचारसभेला संबोधित करताना ते बोलत होते. स्थिरता आणि विकासासाठी पुन्हा एकदा भाजपवर विश्वास दाखवल्याबद्दल मोदींनी कर्नाटकातील जनतेचे आभार मानले. ‘दक्षिण भारतात भाजपला फारसा जनाधार नाही, असं म्हणणाऱ्यांना लोकांनी लोकशाही मार्गानं चपराक दिली आहे. काँग्रेस आणि त्यांच्या मित्र पक्षांनी लोकांचा कौल पायदळी तुडवला होता. जनतेच्या पाठीत खंजीर खुपसला होता. त्यांना लोकांनीच धूळ चारली आहे. काँग्रेसकडं कर्नाटकच्या विकासाचा कुठलाही अजेंडा नव्हता,’ असं ते म्हणाले.
काँग्रेस कधीही आघाडीचा धर्म पाळत नाही. भ्रष्टाचारासाठी हा पक्ष कोणत्याही थराला जाऊ शकतो. भाजपला रोखण्यासाठी कर्नाटकात बनविलेल्या मुख्यमंत्र्याला रोज बंदूक दाखवली जात होती. ते मुख्यमंत्री लोकांमध्ये जाऊन रडायचे. अपहरण झालेल्या एखाद्या व्यक्तीपेक्षाही कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची अवस्था वाईट होती. कर्नाटकचे हे निकाल झारखंडच्या जनतेसाठी दिशादर्शक आहेत. झारखंडमध्ये सुद्धा काँग्रेस व त्यांच्या मित्र पक्षाच्या सर्व उमेदवारांचा पराभव करा, असं आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केलं.















