‘एक रुपयात पीकविमा’ योजनेअंतर्गत राज्यातील १ कोटी ७० लाख ६७ हजार शेतकऱ्यांनी यंदा पीकविमा भरला आहे.सप्टेंबर महिन्यात झालेल्या ‘जोरधार’ पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला असून शासन स्तरावरून शेतकऱ्यांना नुकसान भरापाईची रक्कम तात्काळ देण्यासाठी पावलं उचलली असून ‘एक रुपयात पीकविमा’ योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या हिश्श्याचे ४०६ कोटी रुपये राज्य सरकारने विमा कंपन्यांना वितरीत केल्याने नुकसान भरापाईची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

या तारखे पासून येऊ शकतात खात्यात पैसे
पावसाअभावी खरीप वाया गेलेल्या जवळपास सव्वाकोटी शेतकऱ्यांना विमा संरक्षित रकमेतील २५ टक्के रक्कम मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. २० ऑक्टोबरपासून भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होऊ शकतात.
पीकविम्याची स्थिती
- अर्जदार शेतकरी
- १७०.६७ लाख
- विमा संरक्षित क्षेत्र
- ११३.२७ लाख हेक्टर
- एकूण ‘खरीप’ क्षेत्र
- १४२.१३ लाख हेक्टर
यंदाच्या खरीप हंगामात राज्यातील एक कोटी ४० लाख ९७ हजार हेक्टरवर खरीप पिकांची पेरणी झाली होती. पण, पेरणीनंतर काही दिवसांनी पावसाचा मोठा खंड पडला आणि राज्यातील जवळपास आठशेहून अधिक महसूल मंडळांमधील पिकांना त्याचा फटका बसला. तर पाण्याअभावी पिकांची उत्पादकता देखील कमी झाली.
राज्यातील १५ जिल्हाधिकाऱ्यांनी भरपाईसंदर्भात अधिसूचना काढली. पण, ‘एक रुपयात पीकविमा’मधील शेतकरी हिश्शाची रक्कम विमा कंपनीला सरकारकडून मिळालेली नव्हती. त्यामुळे कंपन्यानी शेतकऱ्यांना नुकसान भरापाई दिली नव्हती. आता सरकारने पैसे वितरीत केले असून तत्पूर्वी, विम्यापोटी केंद्र व राज्य सरकारचा तीन हजार कोटींचा हिस्सा देखील कंपन्यांना मिळालेला आहे.















