मुंबई: विधानसभा निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून शिवसेनेला राज्यपालांनी सत्तास्थापनेचं निमंत्रण दिल्यानंतर आज राजकीय हालचालींना वेग आला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. सत्तास्थापनेसाठी पाठिंबा द्यावा, अशी विनंती उद्धव यांनी केल्याचं समजतं.
भाजपनं राज्यात सरकार स्थापन करण्यास नकार कळवल्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शिवसेनेला सत्तास्थापनेचा दावा करण्याचं निमंत्रण दिलं. आज संध्याकाळी साडेसात वाजेपर्यंत त्यांना सत्ता स्थापनेचा दावा करावा लागणार आहे. त्यामुळे शिवसेनेने आतापासूनच आकड्यांची जुळवाजुळव सुरू केली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची वांद्र्याच्या हॉटेलमध्ये भेट घेतली. सत्तास्थापनेसाठी पाठिंबा द्यावा, अशी विनंती त्यांनी पवार यांच्याकडे केल्याचे समजते. या बैठकीतील अधिक तपशील समजू शकला नाही. दुसरीकडे, राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला असला तरी सत्तास्थापनेसाठी शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबतचा निर्णय काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संध्याकाळी जाहीर केला जाणार आहे.
शिवसेनेकडून राष्ट्रवादीला अधिकृत प्रस्ताव
शिवसेनेचे खासदार आणि केंद्रीय मंत्री अरविंद सावंत यांनी आज पदाचा राजीनामा देऊन पक्षानं एनडीएमधून जवळजवळ ‘एक्झिट’ घेतल्याचं मानलं जात आहे. त्याचवेळी सरकार स्थापनेसाठी शिवसेनेनं जुळवाजुळव सुरू केली आहे. शिवसेनेचे नेते काँग्रेसच्या नेत्यांचीही भेट घेणार असल्याचं सांगितलं जात आहे. तर उद्धव ठाकरे यांनी मुंबईत शरद पवार यांची भेट घेतली आहे. राष्ट्रवादीनं पाठिंबा द्यावा, असा अधिकृत प्रस्ताव शिवसेनेने शरद पवार यांच्यासमोर ठेवला असल्याचं सांगण्यात येत आहे.















