नागपूर- शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्याची मागणी करणाऱ्या व विधानसभेत गोंधळ घालणाऱ्या भाजपच्या आमदारांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज चोख प्रत्युत्तर दिलं. ‘शेतकऱ्यांच्या नावानं राज्याच्या विधानसभेत गोंधळ घालणाऱ्यांचंच सरकार केंद्रात आहे. त्यांच्याकडं राज्यानं यापूर्वीच मदतीची मागणी केली आहे. मात्र, एकही पैसा आलेला नाही. त्यामुळं भाजपवाल्यांनी इथं आदळआपट करण्यापेक्षा केंद्रात जाऊन शिमगा करावा,’ असं मुख्यमंत्र्यांनी सुनावलं.
सावरकरांच्या अपमानाच्या मुद्द्यावरून अधिवेशनाचा पहिला दिवस गाजल्यानंतर आज विधानसभेत विरोधकांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आक्रमक भूमिका घेतली. शेतकऱ्यांना प्रत्येकी २५ हजार रुपये नुकसान भरपाई द्या, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. त्याला विरोधी बाकावरील सदस्यांनी साथ दिली. काही आमदार विधानसभा अध्यक्षासमोरच्या मोकळ्या जागेत येऊन घोषणाबाजी सुरू केली. भाजपचे आमदार अभिमन्यु पवार यांनी बॅनर झळकवला. त्यावर अध्यक्षांनी आक्षेप घेतला. मात्र, पवार ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. ते पाहून शिवसेनेचे आमदार गायकवाड यांनी पवार यांच्या हातातील बॅनर काढून घेण्याचा प्रयत्न केला. त्यातून झटापट झाली व सभागृहाचं कामकाज तहकूब करण्यात आलं.
कामकाज तहकूब झाल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री ठाकरे यांनी झाल्या प्रकाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. ‘विधानसभेचं सभागृह हे एक समृद्ध वारसा लाभलेलं सभागृह आहे. त्या प्रतिमेला काळीमा लागेल, असं वर्तन कोणत्याही लोकप्रतिनिधीकडून होऊ नये’, असं आवाहन त्यांनी केलं. शेतकऱ्यांच्या मदतीच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्र्यांनी भाजपलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं. ‘अवकाळी पाऊस, अतिवृष्टीमुळं राज्यातील शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान भरून देण्यासाठी राज्यानं केंद्र सरकारकडं साडेपंधरा हजार कोटींची मागणी केली आहे. मात्र, अद्याप एक पैसाही केंद्राकडून आलेला नाही. खरंतर जे इथं बोंबलताहेत, त्यांच्याच पक्षाचं सरकार केंद्रात आहे. त्यामुळं त्यांनी विधानसभेत शिमगा करण्यापेक्षा केंद्र सरकारकडं जाऊन गळा मोकळा करावा. वाटल्यास गळा मोकळा करण्याची गोळी आम्ही त्यांना देऊ,’ असं उद्धव यांनी सुनावलं.















