मुंबई – डझनभर आमदार फुटणार असल्याची चर्चा भाजपनं स्पष्ट शब्दांत फेटाळून लावली आहे. ‘भाजपचा एकही आमदार फुटणार नाही. महाविकास आघाडीच्या आमदारांमध्येच अस्वस्थता असून ते बंड करण्याच्या तयारीत आहेत. त्या भीतीतून अशा अफवा पसरवल्या जात असून या चोरांच्या उलट्या बोंबा आहेत,’ असा पलटवार भाजपचे आमदार अॅड. आशिष शेलार यांनी केला आहे.
भाजपचे डझनभर आमदार व एक खासदार पक्ष सोडणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या घरी आज झालेल्या ओबीसी नेत्यांच्या बैठकीमुळं यात भर पडली. त्यावर शेलार यांनी निवेदन काढून तात्काळ खुलासा केला. ‘ही निव्वळ अफवा आहे. तिघाडीच्या नेत्यांकडून अशा अफवा पसरवण्यात येत आहेत. भाजपमध्ये अन्य पक्षांतून आलेले असो वा मूळ भाजपचे असो सर्व आमदार पक्षशिस्त पाळणारे आहेत. पक्षाच्या केंद्रातील व राज्यातील नेतृत्वावर त्यांचा पूर्ण विश्वास आहे. त्या विश्वासापोटीच अनेक आमदार भाजपमध्ये आले आहेत. या सर्व आमदारांवर विश्वास असल्यामुळंच ‘तिघाडी’च्या आमदारांप्रमाणे त्यांना डांबून ठेवावे लागले नाही. उलट भाजपचे १०५ आमदार पूर्णपणे देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीशी आहेत. अनेक लोककल्याणकारी प्रकल्प बंद करून विनाशाचे काम करणाऱ्या या सरकारला लोकांच्या प्रश्नांवर सळो की पळो करून सोडतील,’ असा इशाराही शेलार यांनी दिला आहे.















