मुंबईः – वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी काल एका पत्रकार परिषदेत वर्तवलेला अंदाज आज अखेर खरा ठरला आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये सत्ता स्थापनेसाठी जोर बैठका सुरू आहे. सत्तेसाठी महाविकासआघाडी तयार होत आहे. परंतु, यात शिवसेनेचा पोपट होऊ नये एवढीच इच्छा आहे, असे वक्तव्य काल अकोल्यात आंबेडकरांनी एका पत्रकार परिषदेत व्यक्त केले होते.
अकोल्यात प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेसवर टीका केली. गेल्या २६ दिवसांपासून राज्यात नाटक सुरू आहे. राष्ट्रवादी हा पक्ष बिनबुडाचा आहे. तो कोणत्याही बाजूने जाऊ शकतो. काँग्रेसनेही शिवसेनेबद्दल आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे. नाहीतर मुख्यमंत्रिपदासाठी पुढाकार घेतलेल्या शिवसेनेचा पोपट होऊ नये म्हणजे झालं, असे बाळासाहेब आंबेडकर म्हणाले होते. लोकसभा व विधानसभा निवडणुकीत अॅड प्रकाश आंबेडकरांनी आघाडीत सहभागी होण्याऐवजी एकला चलो रे जाणे पसंत केले होते. त्यांच्या या निर्णयाचा काँग्रेस – राष्ट्रवादीला मोठा फटका बसला होता. २५ ते ३० जागांवर आघाडीचे उमेदवार थोड्या मतांच्या फरकाने पराभूत झाले होते. काँग्रेस – राष्ट्रवादीचे राजकारण हे विश्वासाचे नाही, असा आरोप आंबेडकरांनी याआधीच केलेला आहे.















