जळगाव,(प्रतिनिधी)- जळगाव जिल्ह्यातील उद्योजकांसाठी आणि उद्योग क्षेत्रातील गुंतवणुकीला चालना देण्यासाठी आज दि.७ रोजी जळगावात आयोजित गुंतवणूक परिषदेत २६ उद्योगांत १२०० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार झाले असून यातून ३६२३ जणांना रोजगार मिळणार असल्याची माहिती खासदार उन्मेश पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
खासदार उन्मेश पाटील यांनी पत्रकार परिषदेत माहिती देतांना सांगितले की, बाराशे कोटीच्या गुंतवणुकीच्या सामंजस्य करारांमुळे जिल्ह्याला मोठा लाभ होणार असून सदर गुंतवणूक कृषी उत्पादन प्रक्रिया, केमिकल, इंजिनिअरिंग, केळी व मका प्रक्रिया उद्योग, वस्त्रोद्योग यामध्ये होणार आहे.
रोजगार निर्मितीसाठी उद्योग आले पाहिजेत, त्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर मजबूत होणे अपेक्षित असून महामार्ग, रेल्वेसह हवाई कनेक्टिव्हिटी मोठ्या शहरांशी जोडली जात आहे यासाठी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांचे सहकार्य लाभत आहे.आगामी काळात लिंबू व केळी प्रक्रिया, डाळ, प्लास्टिक, कापूस उद्योग यांच्यावर अधिक लक्ष दिले जाणार आहे. पुढील वर्षात आणखी गुंतवणूक येणार असून, तरुणांना वेंडर होण्याची संधी आहे, असेही खासदार उन्मेश पाटील यांनी सांगितले.
केळी महामंडळाची घोषणा झाली असून, त्याला निधी मिळवून देण्यास प्राधान्य आहे. केळीला मनरेगा कवच मिळवून देण्यात आले आहे. त्याचा शेतकऱ्यांना लाभ होत आहे. केळीसंदर्भात बनाना वाइन यार्ड, बेबी फूड प्रकल्प यावरही विचार सुरू आहे. दरम्यान जळगावहून सुरू झालेली विमानसेवा बंद पडली होती. आधीच्या कंपनीचे अनुभव लक्षात घेता जळगाव विमानतळावर नाइट लँडिंगच्या सुविधेसाठी ५५ कोटी रुपये निधी मंजूर करून आणल्याचे खासदार उन्मेश पाटील म्हणाले.