नागपूर – हिंदू धर्म सर्व धर्मांचा, सर्व ईश्वरांचा सन्मान कराण्यास शिकवतो. भारतातील मुस्लिमांना इतर देशात गेल्यावरही हिंदू म्हणूनच ओळखलं जातं. मग हिंदू असणं हे पाप आहे का?, असा सवाल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी उपस्थित केला आहे. ते नागपूरात बोलत होते.
नागरिकत्व कायद्याच्या समर्थनार्थ नागपूरात लोकाधिकार मंच आणि इतर संघटनांच्या माध्यमातून भव्य मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चाला गडकरींनी संबोधित केलं.
‘हिंदू ही जीवन जगण्याची पद्धत आहे हे हिंदूंना जातीवादी म्हणणार्यांनी समजून घ्यायला हवं. नागरिकत्व कायदा हा भारतीय मुस्लिमांच्या विरोधात नाही. भारतीय मुस्लिमांवर कधीही अत्याचार होऊ देणार नाही. काँग्रेसकडून मतांच्या राजकारणासाठी कायद्याविरोधात चुकीच्या गोष्टी पसरवल्या जात आहेत’, असं गडकरी म्हणाले.
बांगलादेश हा हिंदुस्तानापासून वेळला नसल्याचंही विधान यावेळी गडकरींनी केलं. अत्याचारग्रस्तांना भारत आधार देईल, पण घुसखोरांना या देशात राहण्याचा अधिकार नाही. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानानुसारच सरकार काम करत आहे, असं गडकरी म्हणाले. पाकिस्तानातील हिंदूंची घटती संख्या यावरही गडकरींनी बोट ठेवलं. पाकिस्तानमध्ये २२ टक्के हिंदू होते, ते आज केवळ ३ टक्के झाले आहेत. अनेकांचं धर्मांतरण झालं, अत्याचार झाले, असं गडकरी म्हणाले.
‘आम्ही छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे आदर्श आहेत. त्यांनी कधीच कोणती मशिद तोडली नाही किंवा मुस्लिमांवर अत्याचार होऊ दिला नाही. त्यामुळे देशातील मुस्लिमांना विश्वास देऊ इच्छितो त्यांच्यावर कधीच अत्याचार होणार नाही. काँग्रेसने आजवर केवळ मतांचं राजकारण केलं आहे. त्यामुळे त्यांचा आज बँडबाजा वाजला’, असा घणाघात गडकरींनी केला.