नवी दिल्ली – जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातील पोलिसी अत्याचाराविरोधात काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांनी राजधानी दिल्लीतील इंडिया गेटवर धरणं आंदोलन सुरू केलं आहे. त्यांच्यासोबत काँग्रेसचे अनेक नेते आणि कार्यकर्तेही धरणे आंदोलनात सहभागी झाले आहेत.
जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनावेळी पोलीस आणि विद्यार्थ्यांमध्ये धुमश्चक्री उडाली होती. यावेळी पोलिसांनी लाठिमार करतानाच अश्रूधुराच्या नळकांड्याही फोडल्या. यावेळी विद्यार्थींनींना मारहाणही करण्यात आली होती. त्यामुळे देशभरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या तीन दिवसांपासून दिल्लीत विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू असून त्याची केंद्र सरकारने दखल घेतलेली नाही. त्याचा निषेध म्हणून प्रियांका गांधी यांनी इंडिया गेटवर धरणे आंदोलन सुरू केले आहे. या धरणे आंदोलनात महिला मोठ्या प्रमाणावर सहभागी झाल्या आहेत. सांयकाळी ६ वाजेपर्यंत हे धरणे आंदोलन सुरू राहणार आहे.
धरणे आंदोलन सुरू करण्यापूर्वी प्रियांका गांधी यांनी भाजपवर जोरदार हल्ला केला. सरकारने संविधान आणि विद्यार्थ्यांवर हल्ला केला आहे. दिल्ली पोलिसांनी विद्यापीठात प्रवेश केल्यानंतर विद्यार्थ्यांवर हल्ला केला आहे, असं सांगतानाच आम्ही संविधानासाठी संघर्ष करणार आहोत. आम्ही सरकार विरोधात लढणार आहोत, असं प्रियांका म्हणाल्या.