मुंबई : भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची बैठक नुकतीच पार पडली असून या बैठकीत रेपो रेटमध्ये बदल न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अशाप्रकारे रेपो दर अजूनही 6.50 टक्केच आहे.
विशेष बाब म्हणजे चालू आर्थिक वर्षातील दुसऱ्या चालविषयक समितीच्या बैठकीत आरबीआयने सलग दुसऱ्यांदा व्याजदरात कोणताही बदल केलेला नाही. यापूर्वी एप्रिल महिन्यातही व्याजदरात वाढ झाली नव्हती. रेपो दरात शेवटची वाढ फेब्रुवारीमध्ये २५ बेसिस पॉइंटने वाढ झाली होती.
RBI गव्हर्नर म्हणाले की, चलनविषयक धोरण समितीच्या सदस्यांनी रेपो दर स्थिर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. एप्रिल महिन्यात रिझर्व्ह बँकेच्या चलनविषयक धोरण समितीची पहिली बैठक झाली आणि त्या बैठकीतही धोरणात्मक दर स्थिर ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याआधी महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी आरबीआयने रेपो दरात सातत्याने वाढ केली होती.
RBI गव्हर्नर शक्तीकांत दास म्हणाले, महागाईवर नियंत्रण मिळवण्याचे आमचे प्रयत्न सुरू आहे. महागाई ४ टक्क्यांपेक्षाही कमी करणे हे आमचे लक्ष आहे. आमच्या अंदाजानुसार २०२३-२४ मध्ये त्यापेक्षा जास्त राहील. यासोबतच त्यांनी आर्थिक वर्ष २०२३-२४ साठी जीडीपी वाढीचा अंदाज ६.५ टक्के असण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.
वर्षभरात रेपो रेट २.५% वाढला
गेल्या वर्षभरापासून सर्व प्रकारच्या कर्जावरील (Loan) व्याजदर वाढले, ज्याचा थेट परिणाम बँकेने ग्राहकांना दिलेल्या कर्जावर दिसून आला. बँकांनी सर्व श्रेणींच्या कर्जाचे व्याजदर वाढवले, मग ते वैयक्तिक कर्ज असो, कार लोन, गृहकर्ज किंवा शैक्षणिक कर्ज. मे २०२२ पासून रिझर्व्ह बँकेने रेपो दरात सातत्याने वाढ केल्यामुळे बँकांनी देखील कर्जावरील व्याजदरात वाढ केली.